Friday, December 21, 2007

"ऋतूस्पर्श" कार श्याम पेठकरांना भैरोरतन दमाणि पुरस्कार प्रदान!




भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार त्यांच्यासह यशोधरा काटकर यांना "थर्ड पर्सन' या कथासंग्रहाबद्दल आणि भिन्न' कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे होते. उद्योगपती प्रेमरतन दमाणी, नवरतन दमाणी, पुरस्कार समितीचे निमंत्रक रामदास फुटाणे आणि महापौर अरुणा वाकसे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रु.२५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण गांधीजींच्या विचाराकडे पाठ फिरवली, पण आपल्याला खाते- पिते, समृध्द गाव उभे करायचे असेल तर कचकड्याच्या आयुष्यापासून दूर जाऊन निसर्गाकडे वाटचाल केली पाहिजे, असे मत लेखक श्‍याम पेठकर यांनी व्यक्त केले. झाडांचे हात, वेलींची साथ आणि फुलांची पायवाट सोडून दिल्याने निर्माण झालेली आत्महत्या करायला लावणारी स्थिती बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

विशिष्ट लेखनाचे साचे मोडून टाकणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांची निवड पुरस्कारासाठी केल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द.हातकणंगलेकर यांनी पुरस्कार निवड समितीचे कौतूक केले. दाहक वास्तवाला भिडणाऱ्या लेखकांची नवी पिढी निर्माण होत आहे, त्याचे समाधान होत आहे, असे ते म्हणाले. मराठी साहित्यात या तीन पुस्तकांनी क्रांती घडवली आहे, असे नमूद करून केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकातील वास्तवाच्या आगीचे चटके दाहक असल्याचे सांगितले.

प्रारंभी उद्योगपती नवरतन दमाणी यांनी प्रास्तविक केले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. निवड समितीचे सदस्य कवी दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, द.ता.भोसले, शरदकुमार एकबोटे, डॉ. गीता जोशी, राजेंद्र दास यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Sunday, December 2, 2007

ऋतुस्पर्श ला प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी पुरस्कार...


श्‍याम पेठकर यांचा ‘ ऋतुस्पर्श ’ हा ललित लेखसंग्रह यांना यंदाचा मराठी साहित्यात प्रतिष्ठेचा मानला जाणारा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समिताचे अध्यक्ष, उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरात ही घोषणा केली. पंधरा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे एकोणिसावे वर्ष आहे.
१६ डिसेंबर रोजी इथल्या हुतात्मा स्मृती मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येतील.
पुरस्कार वितरण समारंभानंतर रात्री नामवंत गझलकारांच्या गझलांचा "आभाळ चांदण्यांचे' हा कार्यक्रम होणार आहे. माधव भागवत, सुचिता भागवत यांचे गायन आणि भाऊ मराठे यांचे निवेदन यात असेल.
पुरस्कार निवड समितीत दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. द. ता. भोसले, शरदकुमार एकबोटे, प्रा. राजेंद्र दास व डॉ. गीता जोशी यांचा समावेश आहे. सुमारे दिडशेहुन अधीक साहित्यकृतींतुन या पुरस्कारासाठी ऋतुस्पर्श ची निवड करण्यात आलेली आहे. हलसगिकर यांनी सांगीतले, की सामाजीकता, संवेदनशीलता, विचार आणि लालित्य यांचा विचार करून यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यकृतींची निवड करण्य़ात आलेली आहे. श्याम पेठकरांचा ऋतुस्पर्श निसर्गातील विविध पैलुंचे रमणिय दर्शन वाचकांना घडवतो, असे ते म्हणाले.
यापुर्वी हा पुरस्कार मंगेश पाडगावकर, वसंत बापट, डॉ. निर्मलकुमार फडकुले,आदी मान्यवरांना मिळालेला आहे.
नागपुरातून मात्र केवळ कविवर्य ग्रेस आणि कवी लोकनाथ यशवंत यांनाच हा पुरस्कार मिळाला होता.
श्याम पेठकर हे हा पुरस्कार 'ललितसाहित्य' या क्षेत्रात मिळवणारे विदर्भातील पहिलेच लेखक आहेत. शिवाय पत्रकारीता या क्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती आहेत.

या उपलब्धीबद्दल श्याम पेठकरांचे हार्दीक अभिनंदन!

Tuesday, September 25, 2007

ईसाप आणि बालकवींचा ऋतूस्पर्श!


प्रत्येक ऋतुत निसर्गात वेगवेगळे लक्षणिय बदल होतात आणि याचा परिणाम माणसांवर होतो. कधीतरी हे बदल माणसाला आकर्षून घेतात. त्याल ऋतुचा स्पर्श होतो, आणि....

- साप्ताहीक लोकप्रभा मध्ये नुकतेच प्रकाशीत झालेले श्री. प्रमोद चुंचूवार यांचे समिक्षण.

सध्या या समिक्षणातील काही अंश प्रकाशीत करीत आहोत. संपुर्ण समिक्षण वाचण्यासाठी टीचकी मारा


कुबेराने आपला खजीना उधळून द्यावा किंवा, आकाशात एकाच वेळी हजारो ईंद्रधनुष्ये उमलून यावित तश्या अनेक प्रतिमा, हृदयस्पर्षी कल्पना आणि रुपकांचा खजीना पुस्तकभर विखुरलेला आहे. 'चाफा आरक्त होत मुकपणे बोलू लागलेला असतो, तेव्हा चित्र प्रकटला असतो.... आंब्याचा मोहर लाज लाजून फळला असतो, तेव्हा चैत्र अवतरित झाला असतो.' सौंदर्याचं तत्वज्ञान शिकण्यासाठी चैत्राला शरण जावं, असं सांगत लेखक चैत्राचं चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभं करतो. निसर्गाचं सौंदर्ये रसिकपणे टिपता त्या सौंदर्यावरच हावरटपणे तुटून पडणार्र्या माणसाच्या वैगुण्यावर हे ललितबंध नेमके बोट ठेवतात. आणि म्हणूनच केवळ ललित साहित्य किंवा निसर्ग साहित्य या चौकटीत ऋतूस्पर्शचे विश्लेषण करता सामाजीक अंगानं या साहित्याचं विश्लेषण करावं लागतं. महात्मा गांधी म्हणतात की निसर्गे माणसाच्या गरजा भागवू शकतो, पण त्याची हाव भागवू शकत नाही. ऋतूस्पर्श या ललित बंधात हाच संदेश पटवून देण्यासाठी निसर्गाचं अद्वीतीय अंतरच लेखकानं उलगडून दाखवलं आहे. कारण माणूस सौंदर्याचा पुजक या नात्यानं आस्वाद घेऊ शकतो, आणि त्याला सौंदर्य एकदा पटलं की, तो शांततेच्या निसर्गाच्या कुशीत जगायला शिकेल. निसर्गाला ओरबाडणार नाही. ऋतूस्पर्शाच्या मागची प्रेरणा बहुधा हिच असावी. पण केवळ ऋतुंच्या अवस्थेचं निरिक्षण हे ललितबंध नोंदवत नाहीत, मोगरा, चाफा यांसारख्या यासारख्या ललितबंधातुन लेखक या फुलांकडे पहाण्याची नविच सौंदर्यदृष्टी आपल्याला प्रदान करतो. आणि मानवी समाजातही आपल्या आजूबाजूला मोगरे आणि चाफे आहेत, याची प्रचीती देतो. त्यांचा सुगंध सहवास मिळण्याची प्रेरणा देतो, स्थीतप्रज्ञ म्हटले की, श्रीक्रुष्णाचं नाव आपल्या डोळ्यांपुढे येतं. पण त्याही आधी, हजारो वर्षांपासून एक फुल स्थीतप्रज्ञाचं जीणं कसं असावं याचा प्रत्यय देत आहे, ते म्हणजे चाफा. या सर्व ललितबंधांमध्ये प्रतिकात्मकता प्रतिभा यांचा कळसच साधला आहे. मोगरा हा लेख म्हणजे तर मास्टरस्ट्रोकच. केवळ वेणीत माळलं जाणारं शृंगारीक फुल म्हणजे मोगरा, एवढीच ओळख असलेल्या या फुलाचं वेगळं रुपच लेखक दाखवून देतो. खडतर परिस्थीतीत फुलण्याचं, योग्य वेळी समर्पीत आणि सन्यस्तही होण्याचं प्रतीक म्हणजे मोगरा. मोगर्र्याच्या जन्माबाबतचं लेखकाचं निरिक्षण तर अचंबीत करणारं आहे. "ऋतू तापत जातो. भोगाचे अनुताप विद्रुप होत जातात. सारं सारं चीरडून टाकण्याच्या अवस्थेत फुलांनी कसं फुलावं? फुलांक़डे आर्त सुगंध असतो, हळवे रंग असतात, पण तापट अन्यायाला करडा विरोध करण्याचं धैर्य नसतं. पण अशा जाळून टाकणार्र्या तहानलेल्या वातावरणात मोगरा मात्र धैर्यानं फुलतो. तेजाचा ताप चळत असतांना मोगरा तेजाचं ओज ग्रहण करतो. जळणं आणि उजळणं यातील फरक मोगर्र्याच्या अगदी सहज जाणिवेच्या पातळीवर असतो.
सध्या आपण पावसाळा अनुभवतोय. पहिल्या पावसाला लेखकाने कसं शब्दात नेमकं पकडलंय ते बघा पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो.
निसर्गावर विजय मिळवून त्याला गुलाम करण्यासाठी माणसाचा सध्या सर्व पातळ्यांवर आटापिटा सुरु आहे, मात्र अशा अंदाधुंद प्रगतिची कोणती फळं आपल्याला भोगावी लागतील, याचा तत्वचींतकासारखा ईशाराच लेखक देतो.
"माणसांच्या आज्ञेत वाढणारी झाडं नेहमीच केविलवाणी असतात. झाडांच्या सावलीत वाढणारी माणसं मात्र सदाबहार असतात." निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातेसंबंधाबाबत चिरकालीन सुभाषीत ठरेल, या ताकदिचं हे वाक्य पेठकरच लिहू जाणोत. "फुलांशी मैत्री करता आली, तर मग ते तुम्हाला प्रत्येक ऋतूच्या खाणाखूणा सांगतात. प्रत्येक ऋतुची एक गोंदणलिपी असते." असं लेखक जेव्हा आपल्याला सांगतो, तेव्हा आपल्याला ऋतुस्पर्श ची ओळ ओळच एक विस्मयकारी प्रत्यय देते. तो म्हणजे, लेखकाची पाना-फुलाशी मैत्री झालीय अन त्याला केवळ ऋतूचीच नाही, तर माणसाच्या स्वभावाचीदेखील गोंदणलिपी वाचता येते.
तुमच्यातला हळवा, संवेदनशील माणूस कॉंक्रीटच्या जंगलात हरवला नसेल, आणि ही गोंदणलिपी तुम्हालाही समजून घ्यायची असेल, तर ऋतुस्पर्श वाचायलाच हवा. कारण आपल्याला केवीलवाणा निसर्ग नको, तर सदाबहार मानवी समाज हवा आहे.

Sunday, June 24, 2007

बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट

 

(ऋतुस्पर्श या पुस्तकावर सकाळ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजीत यांचे समिक्षण!)

हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरविली आहे.
वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे.

"गेल्या हजार वर्षांच्या मराठी साहित्याच्या पसाऱ्यात शब्दांच्या आणि शब्दामधून मांडण्यात येणाऱ्या भावनांच्या ज्या खेळ्या मांडल्या गेल्या त्यात श्रीमान संत ज्ञानेश्‍वरांच्या खेळ्या अप्रतिम आहेत. शब्दांची रचना, भावनांची रचना; त्यासाठी वापरायच्या चपखल आणि जिव्हारी जाऊन बसणाऱ्या प्रतिमा आणि प्रतीकं याबाबतीत ज्ञानेश्‍वर माउलीला तोड नाही....शब्दांच्या, भावनांच्या, प्रतिमांच्या, प्रतीकांच्या बाबतीत आधुनिक काळात श्‍याम पेठकर माउलीची उंची गाठू पाहतात, असं मला वाटतं.''...."ऋतुस्पर्श'च्या प्रकाशन सोहळ्यातील राजन खान यांचे हे वाक्‍य मला अजूनही विसरता येत नाही. अलीकडच्या काळात एखाद्या साहित्यकृतीची तुलना करताना एवढं दिलदार आणि दिलखुलास होणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. राजन खान हे नाव अपरिचित नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकानं ही दिलेरी दाखविली तेव्हा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित होते. "मौनराग'मधून स्वतःचे आस्वादक आयुष्य ताकदीने मांडणाऱ्या एलकुंचवारांच्या साक्षीनं त्यांनी श्‍याम पेठकरांना ही पावती दिली. मुख्य म्हणजे, राजन खान यांनी हे भाषण मुद्दाम लिहून आणलं होतं. मी असं बोललोच नाही, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली होती.

"श्‍याम निसर्गावर अतिशय प्रेम करणारा लेखक आहे. इंग्रजी साहित्यात वर्डस्वर्थच्या साहित्यकृतीतून ही झलक दिसते. वर्डस्वर्थने जसं निसर्गावर भरभरून प्रेम केलं, तसंच श्‍यामनंही भरभरून लिहिलं आहे. श्‍यामनं जे लिहिलं त्यातून मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला'', या शब्दांत कौतुकाची थाप दिली आहे, महेश एलकुंचवार यांनी. प्रकाशन सोहळ्यात दोन दिग्गज "ऋतुस्पर्श" वर एवढं भरभरून बोलले. त्यामुळे त्यात नक्की काय आहे, यविषयी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.

"ऋतूवेगळ्या माणसांच्या सहवासानं ऋतूंनाही दंभ चढतो. दंभांचा पसारा वाढत गेला की ऋतू उर्मट होतात. हळव्या जीवांच्या कोवळ्या स्वप्नांची त्यांना काळजी वाटत नाही. फुलावर सावली धरत कळ्यांची चिंता करण्याचंही ते मग नाकारतात. पाऊस थोडा उर्मट झाला की, नद्या बिनदिक्कत गावात शिरतात. पिकानं डवरलेलं रान वाहून नेतात. रडणारे डोळेदेखील अशा पावसात वाहून जातात....'' हे आहे "ऋतुस्पर्श"मधून व्यक्त झालेलं लेखकाचं मन.

"ऋतुस्पर्श'मधून फक्त निसर्गच व्यक्त झालाय असं नव्हे. त्यात आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे संदर्भही जिवंत होऊन नजरेपुढे येतात. यात बावरलेली गोरेटली सासुरवाशीण आहे, कावळ्यांची कावेबाज कावकाव आहे, कुस्त्यांचा फड आहे, दुलईतला मालकंस आहे, पहाटेचा काकडा आहे, पाटलाचा वाडा आहे... आणखीही बरंच काही. तेही अत्यंत दमदार. त्यात आगळी नजाकत आहे. एकतर या ललितबंधातील शब्द न शब्द सकस आहे. भाषा विलक्षण प्रभावी आहे, कारण ती प्रवाही आहे. भाषेचं वैभव काय असतं असं कुणी विचारलं तर "ऋतुस्पर्श'चा दाखला डोळे झाकून देता येईल. "ऋतुस्पर्श'मधील लिखाण डोळे मिटून निसर्ग आठवायला भाग पाडतं. आपणही याच निसर्गाच्या सोबतीनं वाढलो. आपल्याला ही नजर का लाभली नाही, याची कुठेतरी खंत वाटून जाते. निसर्गाच्या या खाणाखुणा अजूनही सभोवताल पसरल्या आहेत याची जाणीव होते. आणि पुस्तक वाचून होते तेव्हा जगाकडे पाहण्याची सहजसोपी परंतु अचाट दृष्टी लाभलेली असते. वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, शांता शेळके, ग्रेस, एलकुंचवार यांच्यासारख्या ज्येष्ठांनी या प्रकारच्या साहित्याचे दालन समृद्ध करून टाकले आहे. अशा अनेक इतर लेखकांनाही ऋतूंनी भूल पाडली आहे. "ऋतुस्पर्श' या ललितबंधात डोकावताना दुर्गाताईंच्या "ऋतुपर्वा'ची आठवण हमखास येते. त्यांनी ज्या पद्धतीने ऋतूंचा पट उलगडला आहे, तीच किंवा त्या शैलीच्या जवळ जाणारी धाटणी "ऋतुस्पर्श'मधून गवसते. या पुस्तकाचा एकूणच बाज प्रेमात पाडणारा आहे. विवक रानडे हा अफलातून माणूस आहे. श्‍याम पेठकरांचे निसर्गावरील ललितबंध विवेक रानडे यांच्या मुखपृष्ठामुळे अधिकच उत्कट झालेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. "ऋतुस्पर्श'ची मांडणी केवळ सुबक, देखणीच नव्हे तर हृदयस्पर्शी झाली आहे.

खरेतर, आजकाल ऋतू केव्हा येतात आणि जातात हेच समजेनासे झाले आहे. आधी लालबुंद पळस बहरला की ऋतूबदलाची जाणीव व्हायची. आता शिव्यांची लाखोली ऐकू आली की शिमगा आल्याचे कळते. रखरखीत उन्हाची फिकीर न करता चालणारी पावले सावली दिसली की आपसुक थबकायची. तो गारवा अंतर्मनात झिरपायचा. आजकाल मजल्यांच्या वाढत्या उंचीने सावली खरेदी करणारे नवे दूत निर्माण करून टाकले आहेत. "जमाना बदललाय', ही हाकाटी तशी नवी नाही. गर्दीच्या आणि गदारोळांच्या कायम वास्तव्याला अनेकांची मने सरावली आहेत. अशांच्या मनात गहिवरांचा दुष्काळ वाढतो आहे. अशावेळी निसर्गातील सात्विकता शोधली पाहिजे. पहाटे उठून दवबिंदू टिपले पाहिजेत. त्यासाठी वेळ काढावा लागतो. हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरवली आहे. वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे. यातील ऋतूबदलांची ताकद माणसांना बदलवायला लावेल. सुकलेले माळरान बघून हिरमुसलेल्या जीवांनी हे पुस्तक अवश्‍य वाचावे. यातील जांभळ्या मैनांशी हितगूज करावी, दवभरला दिवस अनुभवावा. थिजत जाणारे तळे काय असते हे समजून घ्यावे. रंगधून पारखावी, पाखरांची पावले शोधावी. निसर्गाशी एकजीवत्व साधणारी लेखकाची हातोटी तृप्त करून टाकणारी आहे.

अनेक मोठ्या लेखकांना बेदखल करून टाकण्याची परंपरा अलीकडे उदयास आली असे नाही. ती जुनीच आहे. नको तो ताळेबंद जपणाऱ्यांचा गोतावळा अनेक ठिकाणी आढळतो. अशांनी आधी "ऋतुस्पर्श' वाचावे. "मौसम केसाथ साथ बदल जाना चाहिये...' असे अब्बास दाना बडौदी म्हणतात. ते अनेकांना कळविण्याची गरज आहे. स्वतःचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊन आयुष्यभर तंडत राहणाऱ्यांनी तर "ऋतुस्पर्श' वाचलेच पाहिजे. अस्तित्व विसरून ओथंबून येण्यातही वेगळा आनंद असतो की नाही?

-श्रीपाद अपराजित
Posted by Picasa

Wednesday, June 20, 2007

पहिला पाऊस

वार्र्याचे श्वास ओलसर झाले की, मग पाऊस येतो. शिशिरात झाडं बोडकी होतात. वसंतात झाडं पानंपानं होतात. झाडांच्या काळसर निब्बर खोडांवर फुटलेली ही कोवळी हिरवी लव सावली धरायला लागली की, मग पावसाचे थेंब तोलून धरण्याची ताकद पानांमध्ये येते. पाऊस असा नेमक्या वेळी येतो. अवघ्या सजीवांची पाळंमुळं तहानली की, पाऊस येतो अन पाणी धरून ठेवायला जीथं मुळं असतील तिथेच टिकून राहतो. पावसाची हळवी, ओली, रौद्र, भिषण रुपं असू शकतात. पण पहिल्या पावसाचं मात्र तसं नसतं. जन्मदात्याबद्दल कृतज्ञतेचीही ओळख नसलेल्या अर्भकासारखा तो निरभ्र, निरागस असतो. हा पाऊस मनी ध्यानी नसतांना येतो. येईल, येईल अशी आशा विझत गेल्यावर, चिडचिड्या उन्हाशी परत जमवून घेण्याचा प्रयत्न करतांना मग पाऊस येतो.विरहाचे तडे गेलेल्या जमिनिचे उसासलेपण हुंगून पाऊस निघून जातो; पण येण्याचं वचन देऊन. रोडावलेल्या नदीच्या फाटक्या उराला थेंब थेंब टाके देतांना, पाऊस नदिच्या ओटीत पाण्याच्या दोन ओंजळी ओतून रेतीत पाय गाडून बसतो. अश्यावेळी नदिकाठची समाधिस्थ शिळा देखील हलकी होते. पावसाने नदीच्या वाळूत घर केलं की, नदीचा बांधा सुडौल होतो. पण एक होते- पहिल्याच पावसात नदिची वाट निसरडी होते. पावसाची नजर चुकवून आलेल्या एखाद्या चावट संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा बहाणा कुणी करू नये.
पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. नवनिर्मितीचं हे बीज कुठेही असू शकतं. कसंही ते येऊ शकतं. डोळ्यांतल्या स्वप्नांची लिपी वाचण्याची कला जन्मजात अवगत असणार्र्या पाखरांच्या अस्तीत्त्वाशीच हे बीज सलगी करून असतं. पहिला पाऊस नेमकं ते हुडकून काढतो. परागंदा झालेल्या वासरांनी वाळीत टाकलेल्या गावातल्या वाड्याच्या कौलारू छतावरही मग पिंपळ साकारतो. कौलारू घरांच्या छतावर हिरवळ दाटून येते. हे निर्मितीचं बिज कुठेही असू शकतं. तुमच्या-आमच्या हृदयातही. म्हणूनच सहनशक्तीची परिक्षा घेऊन आलेला पहिला पाऊस पाऊसबावर्र्या मनात कविता जागवितो. नांगरलेल्या शेतातील तासांमधून हा पाऊस पळत सुटतो.
जीवनात अनेक पावसाळे पाहणार्र्या जख्ख जीवांना देखील पहिला पाऊस भेटतोच असे नाही. अवघा पावसाळा डोक्यावर घेत मोकळ्या आकाशाखाली फीरत राहिलं, तरी पहिला पाऊस भेटत नाही. हा पाऊस हटखोर असतो. पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्याचे मोती करता आले, तरच हा भेटतो. डोळ्यांत ढग साठवण्याचे कसब ज्याला साधले त्यालाच हा पाऊस भेटतो. मग तो कधीकधी पावसाळा सरतांनाही भेटतो. चिंबचिंब भिजून रिमझिमत राहण्याची शपथ तो देऊन जातो. एखाद्या गंगापूत्रालाही तो समरांगणी शरपंजरी पडला असतांना भेटतो. कुणाला भेटायचंच असेल तर तो ग्रीष्माच्या परसात घुसखोरी करूनही भेटतो. ज्याची नाळ मातीतच गाडली आहे, असे जीव अस्तीत्त्व नांगरून बसतात. ओसाड आभाळाकडे बघत त्यांच्या डोळ्यांमध्ये ग्रीष्म दाटून येतो. डोळे मीटताच मग पावसाच्या आठवणींचे तप्त कढ पापण्यांच्या कनातीतून बाहेर पडतात. अश्या हळव्या वेळी हा पाऊस अनवाणी पायांनी शेत तूडवीत ते कढ झेलून घेतो. असा पाऊस मग आभाळभर होतो. बांधावरच्या बूंध्याला टेकून पावसाची वाट पाहणार्र्याच्या आसूसल्या चेहर्र्याला पावसाचे थेंब कुरवाळतात. शेतामध्ये मग गोरा कुंभार नाचू लागतो. जमीन दाणे मागू लागते. अर्थात हे मागणं भरभरून देण्यासाठी असतं. घरट्यांवर पंख अंथरून पाखरं अंगाई गातात. मातीशी नातं असणार्र्यांची मग धावपळ सुरू होते. बैलांच्या पावलांनी जमीन लेकूरवाळी होते. चंद्रमौळी झोपडीचं छतही मग गोवर्धन होतं. पावसाच्या सार्र्या व्यथा छत झेलून घेतं. अशा पावसाला नाविन्याचा ध्यास असतो. पाऊस मग झोपडीच्या छतातून आत शिरतो. दुधपितं लेकरू आईजवळ सरकतं आणि गोठ्यातल्या गाईच्या निळ्या डोळ्यांत हिरवं रान उगवतं.
हा पहिला पाऊस ओसरला की, कुपावर कारल्याचा वेल काट्यांशी बोलू लागतो. रान गारगार होतं. वारा चिंबचिंब होतो. अंगावरची धूळ झटकून झाडं, पहिल्या रात्रीनंतर नुकत्याच न्हालेल्या नवपरिणीत वधूसारखी संपृक्त टवटवीत दिसतात. कौलारू छतंही आरशासारखी चकचकीत होतात. पहिला पाऊस असा धूळ झटक़णारा असतो. शरीरावरची आणि मनावरची देखील.

पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पहिला पाऊस गावात येण्याआधी गावाने सुकी लाकडे जमवून ठेवावी. ऐन पावसाळ्यात गावात कुणी मेलेच, तर अडचण नको. मरणाचे स्मरण असे नेणिवेच्या पातळीवर असतेच. वाढत्या वयाबरोबर हे धूके अधीक गडद होऊ लागते. मरणाशी नजरभेट झाली, की डोळ्यांना कोवळे अंकूर फूटत नाहीत. पाऊस नेहमीचाच अनुभवायचा असेल, तर जिवंत माणसांनी जातिवंत डोळे हिरव्या पानांआड दडवून ठेवावे. नाहितर मग पाऊस जाणिवेच्या पातळीवर येतच नाही. पेशींनी अंकूरण्याचे नाकारले की, जीवांना पावसाची धुंदी चढत नाही. अश्यंना पहिला पाऊस भेटूच शकत नाही. जाणिवा जीवंत ठेवल्या की, पाऊस पहिला होवून भेटतो. हा पाऊस असा कधीच भेटला नव्हता. ऐन पावसात इमारतीच्या गच्चीवर ऊभे राहून तीच्या केसात फुलं माळतांना सुद्धा पहिला पाऊस भेटला नव्हता. पाऊस कळायला लागण्यासाठी त्याची ओळख असावी लागते. ती करून घ्यावी लागते. पावसाचेही संस्कार करावे लागतात.
साडेतीन वर्षाची चीमुरडी. यंदा पाऊस कधी येणार?, हा प्रश्न घेऊन भिरभिरत होती. वार्र्याला सदाफूलीची ओंजळभर फुलं देऊन तीने त्यालाही प्रश्न विचारला होता. कोरडा वारा मुकपणे तीच्या बटांमध्ये बोटं फिरवून निघून गेला. प्रश्न कायम होता आणि ढगांकडेही उत्तर नव्हते. शापित गंधर्वाने आपल्या सखीसाठी मेघाला दिलेला निरोपही ईतका आर्त नसावा. पाऊस न अनुभवलेली चिमुरडी पावसाची वार्ता विचारत होती. तिला ईवल्याश्या मुठीत पाऊस साठवून ठेवायचा होता. अखेर तीच्या डोळ्यांच्या कडांवर हा प्रश्न सुकून गेला. गोबर्र्या गालांवर सुकलेल्या पाण्याची नक्षी तरारली, पण पाऊस आलाच नाही. घराच्या परसदारी, तूळशीपाशी, हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून ती बसून राहिली आणि वार्र्यालाही कळू न देता तो आला. एका टपोर्या थेंबाने कळूच तीच्या डोक्यावर टपली मारली. काय आहे? मग पाण्याच्या थेंबांची गर्दीच झाली. अंगणात एकेक थेंब जमिनित रूतून बसला. अगदी इतर वेळी तिने ते थेंब रांगोळी काढण्यासाठीच वापरले असते. थेंबांनी तीला गोंजारायला सुरूवात केली अन ती आनंदाने चित्कारली - "पाऊस आला!" तान्ह्या पावसात चिमुकलीसोबत भिजतांना अचानक जाणवलं, हा पहिला पाऊस आहे. पाऊसधारांनी बावरलेली ती, तिने इवल्याश्या हातांनी गळ्याभोवती गच्च मिठी मारली. कमरेभोवती पायांचा वेढा घातला अन पाऊसच कडेवर आल्यागत वाटले.
पहिला पाऊस असा अचानक भेटतो. साधना असावी लागते. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो. कधी तीला पाऊस भेटतो, तर कधी त्याला. दोघांनाही एकाच वेळी पाऊस भेटणं हा दैवदुर्लभ योग आहे. तिच्या मोकळ्या केसांमधून ओघळणारे पावसाचे मोती तो ओंजळीत वेचतो, तेव्हा पाऊस पहिटकर असतो. तिच्या केसांच्या सरी मग जीवन क्यापून टाकतात. पाऊस मग सरी विंचरून वेणी घालतो. हवंहवंसं बंधन घालणार्र्या शृंखलाच होतात तीच्या बटा. ते बंधन असलं तरी रेशमी असतं. आकाशी असतं. पाऊस असा भेटण्याचा तो एकच क्षण असतो. त्यानंतर त्याने तिचे केस पिळून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस येइल, पण तो पहिला नसेल.
पहिला पाऊस भेटतो रानात. मनात. आईच्या स्तनात. पहिला पाऊस मनाच्या चोरकप्प्यात दबा धरून बसलेला असतो. तो भेटण्यासाठी पावसाळाच असावा लागतो, असे नाही. रणरणत्या दुपारी दुसर्र्याचं उजागर सौभाग्य झालेली त्याची 'ती' त्याला भेटते, तेव्हा मनात दबा धरून बसलेला पहिला पाऊस अचानक कोसळू लागतो. अशा वेळी सावरणं कठीण असतं. पाऊस धरवत नाही आणि चिंब होता येत नाही, अशी केविलवाणी अवस्था असते. घरासमोरील अंगणात शेवंतीचं रोपटं लावतांना पाऊस हातातून वाट काढतो. ओणवं होऊन शेतात कापूस वेचतांना हाच पाऊस पाठीवर स्वार होतो. एखाद्या अंधार्र्या रात्री वारा खिडकीच्या तावदानांना धडका देत असतो आणि घरात आईचा निष्प्राण देह पडला असतो. त्या काजळ्या रात्रीही पहिला पाऊस कुंपणापाशी खिन्न बसला असतो. या पहिल्या पावसाची फुलं होतात. ती माळून ठेवता यायला हवीत.
Posted by Picasa

Friday, June 8, 2007

शिशिराचे चाळे


उन्हाला वसंताची चाहूल लागत असतांना शिशिर पानापानांमधून गळतीला लागला असतो. पानांचे पानपण सांभाळतांना वार्र्याचीही दमछाक होत असते. मग वार्र्याची वावटळ होते. गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडायला लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात. पाणी केव्हा तोडायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. खरंतर ज्यांना पिकवावं लागतं त्यांना शिकवावं लागत नाही.
हवा हळूवार कोरडी होते आणि पहाटेचं धूकं संकोच करू लागतं. पहाट अशी संकोचली, की गव्हाच्या ओंब्या दमदार दाण्यांनी ओथंबतात. गव्हाच्या रानातले बगळे गारवा सरत असतांना दूर रानात तळ्याच्या काठी समाधी लावायला निघून जातात. पाचोळा उडवीत वावटळ भर दुपारची गावात शिरते. गावतले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जूना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्याच भावाने गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचीत सरलं तरी देणं मात्र बाकिच असतं. गावाची अशी वजाबाकी सुरु असतांना ऋतूचीत्र पालटून जातं.
गावात अशी वजाबाकी सुरु असतांना शिशिराला म्हातारचळ सुचलेलं. ऋतूंचे म्हातारचाळे तसे देखणे असतात, पण मनाच्या तळाशी एक एक विषण्ण शांतता पसरविणारे असतात. झाडांकडे आता गाळायलाही पानं नसतात. झाडं बेटी भलतीच करंटी वाटू लागतात. पण ऋतूंनी दिलेल्या करंटेपणातूनच वसंत फुलत असतो. गळून पडायला काहिच उरलं नाही, की मगच नवी पालवी फुटत असते. गमवायला काही शिल्लक नसलेलाच कमवू शकतो. शिशिर सरत असतांना झाडं फुलांनी पानांना भागत असतात. अशा दिवसातली दुपार तशी केविलवाणी असते. गावाचे शेतंही ओकीबोकी झालेली. पौषातल्या अश्या एखाद्या दुपारी पाखरं अचानक गावाकडे पाठ फिरवतात. सुगी सरली की, गावाकडे पाठ फिरवण्याची शिकवण पाखरांना पंख पसरण्याआधीच देण्यात येते. एखादी एकट टिटवी निसवलेल्या रानात मनातली हिरवळ डोळ्यात आणून सुगीचे संदर्भ टिपत असते. अशावेळी गावाला दुपारची झोप येत नाही. पण संपन्न सुस्तावलेपणाचा आव आणून गाव डोळे मिटून गप्पगार पहुडलेलं असतं. कडुनिंबाचे अखेरची काही पानं वार्र्याला दोष देत उगाच भिरभिरत जमिनिवर कोसळत असतात. पानांचा जीव जमिनीवर अंथरून झाडं अशी निष्पर्ण उभी असताना, भर दुपारी गावातल्या न्हात्या-धूत्या झालेल्या मुली कडुनिंबाच्या पारावर अंघोळ करीत बसतात. टिक्करबिल्ला खेळायच्या खापरानं त्या अंग घासत असतांना कडुनिंबाची नजर डोळ्यांसकट त्यांच्या वक्षावर गळून पडते. मुलींचा टिक्करबिल्ला केव्हाच सरलेला. पण खेळतांना बांधलेली रेघोट्यांची घरं मात्र डोळ्यांच्या पापणकाठावर सजीव झालेली. मुलींचं असं खेळण्या-बागडण्याचं वय शिशिराच्या अशा दुपारीच का सरतं, ते कळत नाही. अंगी वसंत फुलत असतांना शैशवाची कोवळी पानं अशी झडून गेलेली असतात.
गावाने पानगळ अशी आंगोपांगी गोंदवून घेवू नये. पानगळीची पुरेशी नोंद घेउन ती विसरायची असते. संदर्भासह जपुउन ठेवावे असे शिशिरात काहीच घडत नाही. वसंत तिच्या केसांत माळायचा नसतो, तसा शिशिरही डोळ्यांत भरायचा नसतो. तिन्ही ऋतू त्यांच्या संचीतासह क्षितिजावर पसरलेले असतात. पानगळही अशी हळूच मनात घर करते. झाडांचा धीर सुटला की पानगळ सुरु होते. ऋतूंचे असे गहिवर वहीच्या पानात जपून ठेवले की वहीची ती पानं केव्हाही छळतात. नको त्या वेळी वहीची पानं फडफडतात अन ऐन वसंतातही शिशिराचे चाळे सुरु होतात. हळद-कुंकू सांडवून पौषवारे वाळल्या पानांच्या ढिगामध्ये हरवून जातात. गारठवून टाकणारे वेडे वारे घेऊन माघ येतो. कापर्र्या वार्र्यांनी झाड६ चळाचळा कापतात. पांघरायला पानंही नसतात. हिरवेपण अनावर झालं की असं होणारच. मतलबी शुभ्र झळाळी घेऊन बगळे मग वृक्षांना सलाम ठोकतात. पानांच्या आठवणीत उसासे टाकणार्र्या झाडांच्या कोरड्या फांद्यांवर कावळ्यांची घरटी करपलेल्या वारकर्र्यांच्या कपाळी लावलेल्या बुक्क्यागत दिसतात. माघातले वारे कावळ्यांच्या घरट्यांशी छेडखानी करतात. ऋतू असे बेइमान झाले की गावाशी ईमान बाळगून असणारी ती काळी पाखरं बेभान होतात. वार्र्यावर चोचींनी प्रहार करण्याचा वेडेपणा करतात. कावळ्याची अस्वस्थ कावकाव या दिवसांत दुपार करपवून टाकते. दुपारच्या वामकुक्षीनंतर लगबगीनं दुकानाकडे जाणारा नामदेव शिंपी हातांचे वल्हे करून स्वतःच्याच डोक्यावरून फिरवीत जातो. माणसांच्या करंटेपणानेच गावावर पानगळ आली, हा त्या काळ्या पाखरांचा समज गावाच्या तीन पिढ्यांना काढता आलेला नाही. त्यांची घरटी असलेल्या निष्पर्ण झाडाखालून जाताना भागाबुढीचा डोळा कावळ्यांनी फोडल्याची कथा मात्र गाव वर्षानुवर्षे नव्या पिढीला सरत्या शिशिरात सांगत असते. भागाबुढी याच गावात नक्की रहायची का, ते कुणीच विचारत नाही. शिशिर चाळ्यांनी कावळे चीडले असतांना असले प्रश्न गावाला पडत नाही. कोळपलेल्या गढीच्या बुरुजावर अनाहूत वाढलेल्या कलत्या पिंपळावर बसून एका डोळ्याची कावळी मात्र बुबूळ गरगरा फिरवीत उजाडलेल्या गावाकडे बघत खंतावत असते. काटक्या झालेल्या झाडांवरील घरात वसंताचा गळा वाढवणार्र्या पाखरांनी शिशिराच्या चाळ्याची खंत करायची नसते. आपल्याच घरट्यात वसंत वाढतोय, हे पाखरांना कळू नये, हे पाखरंच प्राक्तन असतं. सुगी आटोपली की नदीचं पाणी आटण्याआधी घराची डागडुजी करून घ्यायची असते. मग माणसंही कामाला लागतात. गावच्या गढीची माती दुपारच्या एकान्तात चोरून नेतात. गावचा पाटिल म्हणे तालेवार होता. वाटण्या झाल्या तेव्हा तराजूने तोलून सोने वारसदारांमध्ये विभागले होते. गढीच्या खचलेल्या जाडजूड भिंतींमध्ये म्हणे सोन्याच्या लगडी लपवून ठेवल्या होत्या. पानगळीतल्या भयाण रात्री कुणीतरी एकटाच अंधारालाही ओळख न देता गढी खोदून सोन्याचा शोध घेतो. सुखाच्या शोधाचे असे कितीतरी खड्डे गढीभर पसरलेले आहेत. गढी आता पानं गाळून बसलेल्या झाडांसारखीच उजाड झालेली आहे.
पाटलाच्या गढीत वसंत कधी येणार, हा प्रश्न पाखरांनाही पडलेला. पाखरांच्या असंख्य पिढ्यांनी पाटलाच्या रंगमहालात उत्कट रसिकतेची मादक दरवळ बघीतली आहे. नशिबाची पानगळ आली आणि केवळ रसिकताच उरली. व्यक्त होण्यासाठी संपन्नता लागते. उपभोगाचे भोग मग पाटलाला छळू लागले. माघातल्या ओरबाडून टाकणार्र्या वार्र्यात शरीरही पिंजून निघालेले. मग रसिकता उपभोगाची दासी झाली. जीवनातले गुलजार वसंत छळतात अश्यावेळी! म्हातारा पाटिल वसंताच्या आठवणींनी बेभान व्हायचा. मग गावातल्या गरत्या घरच्या घरंदाज गृहिणींच्या पायातही चाळ बांधायला म्हातारा पाटिल धावू लागला. गावाच्या चीरेबंदीपणाला असे तडे जाऊ लागले. पाटलाच्या तालेवारपणाखाली वाकलेले गाव एक दिवस ताठ झाले. श्रीमंतीच्या आठवणीत खंगलेल्या पिढीनंही म्हातार्र्याविरुद्ध बंड केले. म्हातारा पाटिल आता गढीवरच्या वाड्यातल्या वरच्या खोलीत बंदिस्त. पानगळीने हैराण झालेल्या भणभणत्या माध्यान्हीला वेड्या पाटलाच्या डोळ्यांत वसंत नाचू लागतो. भोगलेल्या स्त्रीयांच्या नावाने पाटलाची कावकाव सुरु होते. वसंतसेनेच्या अनावृत्त अवयवांच्या रसभरीत वर्णनांनी पाटलांची बेताल बडबडही तालबद्ध होते.
शिशिराची पानगळ झेलत वसंत तेव्हा गावतळ्याकाठी निवांत बसलेला असतो. शिशिराचा प्रवेश संपला, की त्यालाच रंगमंचावर यायचे असते. असे प्रवेश ऋतूंना चुकूनही चुकवता येत नाहीत.
Posted by Picasa

Tuesday, June 5, 2007

स्वप्नऋतू

ऋतूंचे हल्ले समर्थपणे पेलता आले नाहीत तर आपण त्यांना निमूटपणे शरण जावे. तरीही ऋतूंनी दाखविलेल्या हळव्या स्वप्नांच्या फसव्या आवाहनांना भुलून जाऊ नये. कारण ऋतूंचे असे अस्मानफेक हल्ले कालमानाप्रमाणे सुरूच असतात. काळ काय ऋतूच्या स्वाधीन असतो? ऋतू काही काळ आपल्या प्रभावाने भारून टाकतात; पण मोसम बदलला की ऋतूंनाही जावेच लागते. कुठलेच ऋतू कुणाचेच नसतात. फुलांचे सुद्धा! ऋतूंचे तरी ऋतू असतात का? निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे ऋतू... आणि ऋतूंना पडलेलं स्वप्न म्हणजे वसंत. स्वाती नक्षत्राला सौंदर्याचं स्वप्न पडावं तशा सौंदर्याची उधळण करीतच वसंत येतो.
वसंत म्हणजे काळाची कोकीळ कंठातून आलेली सुरेल,पण व्याकूळ साद. रंगसाधर्म्यात स्वप्न हरवून बसलेल्या कोकिळेला पडलेली रंगभूल उतरण्याचा हा काळ. रंगांच्या मेळ्यात नेमका स्वतःचा रंग ओळखण्याची अदा या ऋतूत आहे. असा स्वतःचा नेमका रंग सापडला की, मग जीवनाचे सुर सापडणे तसे कठीण नसते. वसंत म्हणजे रंग गंध आणि स्वरांचे संधीपर्व. वार्षीक कालचक्राची ही सुरम्य संध्याकाळ. ही विग्रहाआधीची संधी असते. वेड्या फुलांच्या आवेगी फुलव्यावर रुढीवादी, उग्र म्हातार्र्यासारखा सुर्य कोपत जातो आणि स्वप्नांची निर्माल्य होतात. डोळ्यांच्या पापणकाठावर पानगळ सुरु होते. मोहोरण्याचा गुन्हा झाल्यागत. झाडेही बेटी भलतीच शांत उभी असतात. ग्रीष्मातली ही झाडं कुणाच्यातरी अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांसारखी दुःख पांघरल्यागत दांभिक वाटतात. सार्र्याच अस्तीत्त्वाचा पाचोळा होऊन गावकुसाच्या पायवाटेने वावटळत निघून जातो. आपण आपल्या अस्तीत्त्वाची राखड सावडत असतांनाच ऋतुचक्र फिरत असतं. कुठून तरी वार्र्याची मुजोर, पण थंड लहर येते. तिला पाण्याचा बेगुमान गंध असतो. आभाळ केविलवाणं झालं म्हणून उडून जाणारे पक्षीदेखील मग पंखात ओलावा वेचायला परततात आणि एका निसटत्या क्षणी मेघांना गहिवर येतो. धीर सुटल्यागत ते कोसळू लागतात. कामोत्सुक हरिणीसारखी जमिनही गंधवेडी होते. तो मीलनाचा गंध असतो. खरं सांगायचं तर वसंताचं बीज त्याचक्षणी रुजतं. मिलनाला दिलेला तो होकार आकार घेतो. पृथ्वी जडावते. शिशिर म्हणजे वसंतागमनासाठी लागलेले डोहाळेच. त्या गर्भारलेल्या क्षणांची स्वप्नवत फलश्रृती म्हणजे वसंत.

वसंतात मोहरल्या आंब्याखाली बसून सावलीची शाल पांघरून डोळे मिटून घेतले की, मनात सावळ्याच्या बासरीचे स्वर फिरायला लागतात. अश्या क्षणांना अगदी ठरवूनही नाकारता येत नाही. नकार आणि होकार दोनही आपल्या हातचे नसणारे असे क्षण नियती आपल्या ओच्यात टाकते. ती ऋतूभूल असते. असे क्षण आपण भोगतो, की ते क्षणच आपला उपभोग घेतात?... की आपण आणि असे गुलबास क्षण या दोहोंचीही संधी घडवून आणखी कुणी आपल्या आत मोहरत असतं? तसे संध्याकाळ म्हणजे नवनिर्मितीचे क्षण!
वसंतातली संध्याकाळ गावाकडच्या एकट चिरेबंदी वाड्यातून थरथरत्या पावलांनी गावामारूतीला दिवा लावायला एखादी जख्ख म्हातारी निघावी, तशीच वाटते. अशा वेळी मग केवळ जमिनच नव्हे तर आभाळही गावचे होते. बहरण्यासाठी कुठे वयाचं बंधन असतं? सांज कातर करत गेली आणि वसंतात मनमोगरा फुलला की केव्हाही बहरता येतं. वसंतात जीवाची फुलं होतात फुलांना बहर येतो. फुलं फुलण्याची मर्यादा तोडून फुलतात. असं बंधमुक्त फुलणं, हेच फुलांचं प्राक्तन असतं. फुलं ईतकी फुलतात की देठाचेही फुल होते. वसंताला फुलांची सवय असतेच. पण प्रत्येक फुलाला कुठे वसंताची सवय असते? मग वसंताची सवय नसणारी अशी फुले अस्वस्थ करतात. तिच्या गनर्र्यातील चाणाक्ष फुलांना मग डोळे फुटतात. एखाद्या कातर सांजेला वेल्हाळ झालेल्या पाखराला आवाहन देतात. थव्यापासून तुटलेलं असं पाखरू मग भरकटत जातं. तिच्या सावलीत मग मोगरा फुलतो. तिच्या पावलागणीक बकुळफुलांची ओंजळ जमिनिवर पसरते. वेडा वसंत तिला सांगत असतो, फुलं अशी वाटेवर उधळून द्यायची नसतात. अनोळखी पावलं हुरळून जातात. पण अश्या उधळल्या जाणार्र्या फुलांवर आणि हुरळून जाणार्र्या अनोळखी पावलांवर वसंताचा ताबा नसतो. फुलांच्या पायवाटेवरून तो तिचा ठावठीकाणा शोधून काढतोच. तुळस कृष्णकृष्ण होते. मत्त मंजीर्र्या सारंकाही मूकपणे जगाला सांगून टाकतात. प्रत्येक नदिची यमुना होते आणि बासरी वार्र्याच्या हाती सापडते. राधाबाधा झालेली ती मग बासरीच्या तानांनी वेडावते. मुग्ध ती, अबोल ती आणि तीच्या डोळ्यांच्या पाऊलवाटेवर आपलं गाव शोधणारा तो... काहीच कुणाच्या हाती नसतं. हात हाती गुंफतात आणि गाणं जन्माला येतं.

हे जीवनगाणं असतं. न संपणारं. अव्यय. अविनाशी. पायवाटेतून पळवाट शोधणारी फुलं हळवी ती आणि अनोळखी पावलं नेहमी तशीच असतात. पिढ्या बदलतात. सारं काही तेच आणि तसंच असतं. मग प्रत्येक वसंतात पहिल्यांदा फुललेलं ते गाणं आठवतं. ती अव्यक्त पण आवेगी प्रित आठवते. आठवते यमुना झालेली नदी आणि तिचं राधा होणं. भूल पाडणारी ती सावळी सांज आणि मन डोलविणार्र्या बासरीच्या ताना. श्यामरंगात न्हालेले ते क्षण कुठल्याही ऋतूत आठवले, तरीही तो वसंत होतो. वसंतानं एखाद्याला झपाटलं की, त्याच्या अवघ्या आयुष्याचा वसंत होतो. वसंताच्या चाहूलीनंही तिच्या रेशीमस्पर्शाची भावना अंगाअंगातून सळसळत जाते. अवघा देह मग एखाद्या श्रृंगारिक कोरीव लेण्यासारखा उन्मत्त होतो. तिच्या मेंदिभरल्या हाताच्या खुणा मग अंगभर गोंदून राहतात. वसंतात त्या शीण झटकून चटकदार होतात. प्रियतम मग आभाळ करून कवेत घेतो. चुंबनाच्या आठवणिने सारे कसे 'आफरीन आफरीन' होते. प्रत्येक पाकळीचे ओठ होतात. ऋतू बदलतात. झाडे पाने गाळून उध्वस्त होतात. फुलंही कोमेजतात; पण त्यांच्या संगतीनं उमललेले क्षण मात्र कोमेज़त नाहीत. त्या सदाबहार क्षणांचा हात धरून वसंतबहार परत फिरून येऊ शकते. मग गेल्या वसंताचा चावटपणा नव्या वसंतातील फुलं वार्र्याला सांगतात. वारा विचारतो- तू कुठं होतास तेव्हा? फूल मग ओठ दुमडून उगाचच हसतं. अवखळ वार्र्याला तिच्या पदराशी खेळण्याशिवाय दुसरं काय सुचणार? तिच्या ओंजळीत कोण होतं? वसंतात फुलं अशी बोलकी होणंही तसं बरोबर नसतं. नेमकं काय बोलायचं नि काय दडवून ठेवायचं, हे फुलांना कुठे कळतं? तसंही फुलांना काही हातचं राखून ठेवणं कुठे जमतं? पण रंग गंध, पराग, मध... सारं वाटून टाकतात म्हणून त्यांना परत भरभरून मिळतं. अश्या दिलदार फुलंची शेज गाववाटेवर पांघरून वसंत एखाद्या चांदण्या रात्री निघून जातो. कोकिळेची तान आभाळ गोंदवून गेली असते. वसंत-खेळ म्हणजे स्वप्न की वास्तव, या भ्रांतीत उन्ह तापायला लागतात. वारा बेभान होउन स्वप्नांच्या खाणाखूणा शोधत सैरभैर होतो. स्वप्नवेडात आणखी काय होणार?

Monday, May 28, 2007

रंगधून


आयुष्यात काही क्षण सावळ्याच्या बासरीतून यमुना पाझरावी तसे तराळत येतात. मनाचा रीता डोह मग भरभरून ओसंडतो. आयुष्याचं गोकुळ होतं. स्वप्नांच्या किनार्र्यावर राधा नाचू लागते आणि रंगाचं कारंजं होतं. वसंत आला की, अशी रंगधून निनादू लागते. या रंगाला स्वरगंधाची गोड खळी पडलेली असते. या अश्या वातावरणात कायम शहाणे असणार्र्यांनाही वेड लागावं. जीवनाला जगण्याचं खूळ लावणारे हे दिवस असतात. दिवसाच्या धगीनं रात्रही पेटत राहते, मग गात्रांची काय कथा? रात्र फुलत जाते अन रात्रीची फुलं होतात. फुलं म्हणजे रंग आणि गंधांचे कोवळे दूतच. या दिवसांत मग फुलांच्याच चर्चा असतात. फुलांच्याच भेटी होतात, भेटीचीही फुलं होतात. भेटींची झालेली ही फूलं मग अनंतापर्यंत सोबत करतात. फुलांच एक बरं असतं. फुलं कोमेजली तरी त्यांच्या सुगंधांचा अर्क करून ठेवता येतो. अत्तरानं माणूस धूंद होतो, पण बेधूंद होत नाही. अत्तरानं अस्तीत्त्व मोहित होईल, पण अत्तराची नशा नाही चढत . अत्तर हृदयाचा ताबा घेतं, मेंदुला गुलाम नाही बनवीत. निर्व्याज, निष्पाप फुलांची दारू कशी होणार? सुगंध देऊन विलीन होणारं अत्तर होणं, हे फुलांचं प्राक्तन असतं. म्हणून फुलं कोमेजली की, त्यांच निर्माल्य होतं, कचरा नाही.

फुलांचा गंध श्वासात गोठवून घेतला अन डोळे मिटले की, मनात रंगवेलींची नक्षी उभी राहते. पण, गंधवेडानं श्वासांची कोरीव शिल्प होण्यासाठी सजीवांनी रंगांशी प्रामाणीक असण्याची गरज असते. समर्थपणाचा ॐकार जागविल्याशिवाय रंगांशी जवळीक साधता येत नाही. मुळात रंगून जायचे असेल, तर मनाची पाटी कोरी हवी. रंगता कशातही येतं; पण त्याआधी अस्तीत्त्व फुलांवर पडलेल्या दवबिंदूंसारखं निर्मळ असायला हवं. त्यासाठी सामान्यांनी पूजा करावी. पूजेनं मन निरभ्र होतं. निरभ्रता नेहमीच विशाल असते. अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेली असते. सकल जिवांचा दरवळ असा अनंतापर्यंत पोचण्यासाठी पूजा करायला हवी. पूजेतही रंगून जाता येतं आणि पूजा कशाचीही करता येते. प्रतीकांचीही आणि परमेश्वराचीही! ज्याला फुलं, त्यांच्या रंग गंधासहित कळली, त्याला पूजा कळते.पूजा फुलांचीही करता येते. फुलांच्या पूजेची मग कवीता होते. कविता मग तिच्या असंख्य रंगांसह अस्तीत्त्वाचा तळ गाठते. आपल्या अस्तीत्त्वाचीही पूजा करता येते. अस्तीत्त्वाची पूजा हा प्रतीकातून परमेश्वराकदे जाण्याचा मधला टप्पा आहे. या प्रवासात अस्तित्त्वाच्या तळाशी अधिष्ठीत झालेल्या कवितेची भेट होते. 'मी कोण ?' या प्रश्नाचे उत्तर केवळ कविताच देउ शकते. पूजा कवितेचेही करता येते. मग शब्दांची फुले होतात. कवितेलाही रंग चढतो. रंग मग शब्दांनाही सोडत नाही. अस्तीत्त्व कातर झालेल्या जीवांना हे रंगच शांत करतात. पूजा रंगांचीही करता येते. ही पूजा साधली की पानांचीही फूले होतात. वसंताला ही पूजा साधलेली आहे. म्हणूनच मग वसंतात पानेही विविध रंगात रंगून जातात. वसंतपूजाही होते. झंकारलेल्या हृदयाची माणसं वसंताची पूजा करू शकतात. मनात एकदा प्रेमाचा मोगरा फूलला, की वसंतपूजा नकळत सूरु होते. माणूस हळवा झाला की, उंबरे अडवितात त्याला; पण उंबरठा ओलांडल्याशिवाय माणूसपणही गवसत नाही. झंकारलेल्या आयुष्याचे अर्थही गहाण असतात, हे खरे असले तरीही वसंताची मनोभावे पूजा केली, तर जिथे वाट निसरडी होते, तेथून मागे फिरण्याचं कौशल्य आपोआपच अंगी येतं. पण त्यासाठी माणूसपण जागवावं लागतं. फुलांचं हळवेपण कळावं लागतं. रंगांधळ्यांना माणूस होता येत नाही. असे रंगांधळे मग रंग वाटून घेतात. रंगांवर अधीकार सांगतात.


रंग कधीच कुणाचे गुलाम नसतात. स्वतःचेही! समर्पणाचे दूसरे नाव म्हणजे रंग. एकमेकांत मिसळतांना स्वतःचे संपूर्ण अस्तीत्त्वच विरवून टाकण्याचं कसब रंगातच असतं. नव्हे, तो त्यांचा निसर्गस्वभाव असतो. तरीही रंग एकमेकांचे स्वतंत्र अस्तीत्त्व नाकारत नाहीत. सहजीवनाची दिक्षा रंगांकडूनच घ्यावी. आपल्या अस्तीत्त्वाच्या सार्र्याच कक्षा रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. शब्दरंग, काव्यरंग, भक्तीरंग, मनोरंग, प्रेमरंग... रंगांच्या या प्रवासात श्रीरंगाची भेट कधीही होवू शकते, पण त्यासाठी रंगांशी रंगांइतकंच समर्पित असावं लागतं. प्रेमाच्या सप्तरंगात विलीन व्हावं लागतं. आपण द्वेषासाठी पायघड्या अंथरतांना प्रेमाला मात्र नकार देतो. जीवनाचे जड ओझे निमूटपणे वाहतांना बकुळफुलांच्या भारालाच भितो.

एकदा तरी प्रेम करावं. लैलाच्या मजनूला स्मरावं. शिरीनच्या फरहादला स्मरावं. कृष्णवेड्या राधेला स्मरावं... मग जीवनाला 'गिरिधर गोपाल' म्हणत विषही प्राशन करता येतं. पचविता येतं. प्रेम अंकुरलं हृदयात की, हे फार सोपं होतं. रात्रीला चांदण्याची फुलं होतात. स्निग्ध रंगात वेल्हाळ झालेल्या रात्री तिच्या गात्रांची फुलं होतात. फुलांकडे वेळ थोडा असतो. मग ते खळखळून हसून घेतात, प्रत्येक क्षण जगून घेतात. अनासक्त अनावर झालेली ती मग हळूच त्याचा हात ओढून घेते आणि डोळ्यातील काजळाने त्याच्या हातावर लिहीते - 'प्रेम!' प्रवास असाच सुरु होतो. असे झंकारलेले जीव काहीही करायला तयार असतात. अशी प्रत्येक रात्र उजळलेल्या सकाळीकडे जात असते. पहाटेच्या भूलभुलैय्यात सुर्यही हरवतो. जर्द, गुलाबी रात्रीच्या आठवणीने मत्त केशरी होतो. क्षितिजाच्या पलीकडे रात्रीची काजळकडा तशीच असते. ती दोघं त्या काजळकळेवर विसावलेली असतात. त्यांच्या दिवसाचीही रात्र झालेली अन या दिवसाला स्वप्नांच्या लाघवी वेलींनी वेढा घातलेला. मग उज़ेडाच्या गालावर अंधाराचा तीट लावत रात्र येते. कुणाची तरी हळदभरली हळवी पावलं हळूच घरात येतात. हळदगोर्र्या हातांनी गात्रागात्रावर समर्पणाची मेंदी लावून निघून जातात. मेंदी रंगत राहते. मेंदी अशी रंगली की, हात लाजून आरक्त होतात. असे बावरे हात देहभर फिरले की, कळ्यांची फुलं होतात. ही फुलं जपून ठेवावी. कारण जातांना ते हात नेमकी कळ्यांची झालेली फुलं मागतात. फुलांची एक जमात उभी राहते. येणार्र्या रात्रीला तो त्याच फुलांचे गजरे आणतो... पण गजर्र्यांची अशी लाजरी भेट प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असे नाही. नव्हे, येतच नाही, हेच खरे. कारण प्रेमाला आपला कडवा विरोध असतो. प्रेमाच्या नकाराने विदग्ध झालेले जीव मग करपून जातात. फुलं त्यांना नकोशी वाटू लागतात. रंगांचा ते छळ करतात. स्वप्नांसह पापण्याही खुडून नेतात. पाकळ्या नखांनी कुरतडून टाकतात. अशांना मग फुलं घाबरतात आणि रंग टाळायला लागतात. असे झाले की, मग जग समजतं 'आपल्यात आला.' पण एक नक्की. रंगधून जाणली की, प्रेमाच्या कबरीचाही ताजमहाल होतो. वसंताची जादू ओसरून वेड्या रंगांनी पळ काढण्याआधीच रंगवेड्यांनी त्यात चिंब झाले पाहिजे

ऋतुस्पर्श - डॉ.सुलभा हेर्लेकर यांचे समिक्षण.

ऋतुस्पर्श हे श्याम पेठकरांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं ललितबंधांचं पुस्तक! मुखपृष्ठ अतिशय देखणं! आकारही थोडा अनोखाच. दोन हातंच्या प्रतिकांतून माणूस, भाषा, आणि स्पर्शातीत ऋतुंचे झंकार एकवटले आहेत. तसे श्याम पेठकर हे पत्रकार, कथाकार, नाट्यनिर्मिती करणारे... पण या सर्वांपेक्षा त्यांचे हे ललितबंधांचे स्वरूप अधीकच भावले. हे सारे ललितबंध अग्रलेख म्हणून प्रसिद्ध झालेत. वृत्तपत्रात एवढे लालित्य असणारे तेही ग्रंथलेखांच्या रुपातून - हे वेगळेपण सततच जाणवत राहते. केव्हातरी आठवतंय, 'ऊन्हाळा' या विषयावर कै. भाऊसाहेब मालखोडकरांनी अग्रलेख लिहला होता.. इथे तर सारेच ऋतू... चैतन्याचे खांब घेऊन उभे राहणारे!
राजन खान यांनी 'श्याम पेठकर हा निखालस जिवंत मनाचा माणूस आहे' असं म्हटलंय ते अचूक आहे. माणूस आणि निसर्ग ईथे एकरूप झालाय. एकूण ४८ लेखांचा हा संग्रह! कोणतेही पान उघडावे आणि कुठलाही लेख वाचावा... मन पिसासारखं हलकं होऊन जातं. इथे मुळी ललितबंधांची व्याख्याच कोलमडून पडते. ईथे आहे ते संवेदनशिल मनाने टिपलेले ऋतूंचे लाघव, लडिवाळपणा, देखणेपणा, हिरवेपणा, आणि अतिव उदासलेपणाही. या प्रत्येक लेखाला एक प्रकृती आहे. आपलेपणा आहे. गोडवा आहे. निसर्गाचा गारवा आहे. एखादा लेख जरी वाचून काढला तरी थकवा दूर होतो. निवांत वाटतं. स्वप्नांत तरंगल्यासारखं वाटतं. यातला पहिलाच लेख 'स्वप्नऋतू' - याची साक्ष देतो. लेखक सांगतो, "वसंतात मोहरल्या आंब्याखाली बसून सावलीची शाल पांघरून डोळे मिटून घेतले की, मनात सावळ्याच्या बासरीचे स्वर फिरायला लागतात. अश्या क्षणांना अगदी ठरवूनही नाकारता येत नाही. नकार आणि होकार दोनही आपल्या हातचे नसणारे असे क्षण नियती आपल्या ओच्यात टाकते. ती ऋतूभूल असते. असे क्षण आपण भोगतो, की ते क्षणच आपला उपभोग घेतात?... की आपण आणि असे गुलबास क्षण या दोहोंचीही संधी घडवून आणखी कुणी आपल्या आत मोहरत असतं? तसे संध्याकाळ म्हणजे नवनिर्मितीचे क्षण!" हा लेख असाच लालित्यपूर्ण अंगाने आपल्याला कवेत घेत पुढे जातो. आपल्या जीवनातल्या अनेक स्मृती फूलवत जातो. आणि असा जातो की असे काही होतेय याची त्याला जाणच नसते. पाखरांना स्वतः उडण्याची जाण असते का?... तसेच पाखरांच्या सहजपणे उडण्यासारखेच हे पेठकरांचे सारे लेख सारं शरीर, मन व्यापून टाकतात. स्वतःचे दूसरे टोक गाठतांना 'ग्रीष्माचे अवतरण' वाचले नि सूचकपणे आलेली अर्थाची वलये, सामाजिकता आणि तरी भाषेमध्ये लपलेली ... सौंदर्याची जात. "आमचे घर गळते तेव्हा आमचीच चूल जळत असते. आमच्या प्रारब्धाचे हे प्राक्तन तूलाच काय; पण असेल अस्तित्त्वात तर त्या परमेश्वरालाही पुसता येणार नाही! तेव्हा ग्रीष्माचा अर्थ आणि पडणार्र्या पावसाचा भिजूपणा कळून येतो."
माणसातला माणूस कसा निसर्गमय होतो आणि निसर्गात विरघळतांना त्याचे माणूसपण कसे विरघळते - याचं वर्णन पेठकर अत्यंत नेमक्या आणि अचूक भाषेत करतात. 'मौनचाफा' यात "मौनधुंद सुगंधाला शब्धाचे धूमारे फुटू लागले तर फुलांना शब्दकळा येतील. माणूस हळवा झाला की, उंबरे अडवतात त्याला अन प्रसंग हळवे होतात. अशा वेळी फुलं नेमकी बोलू लागतात. असे कितीतरी शब्दांच्या सहज फुलव्यातून पेठकर आईचं मनही उलगडतात. "ओंजळभर फुलं आईच्या ओंजळीत टाकतांना त्याचे हात चाफ्याचे होतात. किंवा समाधिस्त आईचे डोळे चाफ्याचे होतात. तो कृष्ण कृष्ण होतो. डोळे मिटतात अन मनात मौनाचा अंतर्नाद घुमतो. "मौनचाफा" हा लेख असा वेड लावून जातो. कितीदा वाचला तरी मन भरत नाही. पावसाचे तर किती अंगांनी लेखक वर्णन करतो - पहिला पाऊस, भिजपाऊस, पाऊसवेणा, भेत पावसाची, किती तर्र्हांनी पावसाचे उत्कट चित्रं लेखक रंगवतो. कुठल्या रंगात भिजायचं ते फक्त आपण ठरवायचं. निसर्गाच्या अनेक संदर्भातून आणि भाषेच्या संभ्रमातून देखणी ऋतूस्पर्श चित्रे उमटवतांना भाषा जिवंत असणे किती महत्त्वाचे असते. जणू निसर्ग आपणच आहोत - निसर्गाचे जगणे आपलेच आहे या उत्कट पारदर्शी भाषेचे लेणे पेठकरांना लाभले आहे. या सार्र्याच अनुभवात स्वप्नांची हलकीशी किनार आहे. या निसर्गानुभवांनी लेखकाला समृद्ध केले आहे. त्यांच्या अभिजात शब्दकळेने, उत्कट भाषाभिव्यक्तीने समुर्त करून त्या जादूभर्र्या निसर्गात आपल्याला ते घेऊन जातात. ऋतूचा एक सुंदर प्रवास ते काव्याच्या उत्कट भाषेतून घडवतात. तसे तर ललितलेख नव्हतेच. ललितबंधही नाहीत. तर हे ललितगंधच आहेत. 'मी' चा घेतलेला ऋतूस्पर्शी बोध आहे. या निसर्गाच्या 'मी' चे जगणे लयधुंद तर आहेच शिवाय त्याच्या शब्दात एक अनुभवाचे लेखही आहे. एखाद्या ऋतूतून एखादंच झाड, एखादा ऋतूमग्न पक्षी, एखादा अनावट राग, एखादं पावसाचं वलय व्हावं ईतकं झपाटून टाकलं की त्याचा आणि त्यांच्या अंतर्मनाचा संवाद होत सुरेल लयीत त्यांचे ललितबंध आकार घेतांना जीवनाला सामोरे जातांना हसर्र्या ताज्या फुलांच्या ताटव्यासारखे त्यांचे मन सारे निसर्गकण टिपून घेते. ऊब, संधीकाळ, चंद्रसुगीचे दिवस, तिचे दिवस, हे बंध तर किती तरल उमटले आहेत.
ललितलेखनाचा स्व-अनुभव हाच मुळी पाया आहे. सच्च्या अनुभवाचे हे चित्रण असते. या चित्रणातून त्याचा स्वभाव, त्याची शैली, त्याचे संस्कार, त्याच्या लेखनातून व्यक्त होते. ना.सि.फडकेंपासून तो रविंद्र पिंगे, वि.स.खांडेकर, शिरिष कणेकर आणि अलीकडचे श्रीनिवास कुलकर्णी, वासंती मुजुमदार, दुर्गाबाई भागवत, इत्यादी लेखकांच्या जाणिवा त्यांच्या ललितलेखनातून, सामाजीक अनुभवातून व्यक्त होताना दिसतात. दुर्गाबाईंचे ऋतूपर्वमधले ललितलेखन ऋतूंवरचेच. त्यांच्या ललितलेखनातून सतत दिसत राहतो तो जीवनाला सर्व बाजूंनी कवेत घेउ पाहणारा, त्याचा तळ शोधू पाहणारा एक मनस्वी कलावंत! आपल्या जाणिवा, आणि नेणीवा याला एकाच वेळी स्पर्श करून जाणारी वृत्तीची डूब कलावंतांच्या निर्मितीप्रक्रीयेत फार महत्त्वाची असते. जो काही आपला आशय असेल, त्याची खोलात खोल जाऊन अनुभूती घ्यावी आणि मग त्या अनुभूतीची स्वतःच्या मनात घडली असेल ती जाणीव ताद्रुष्याने प्रकट करावी! नेमके श्याम पेठकरांच्या संदर्भात हेच घडलेय. उलट दुर्गाबाईंच्या वर्णनापेक्षाही पेठकरांचे ललितबंध मनाचे तळ ढवळून काढतात.
पेठकरांचे ऋतूस्पर्श वाचतांना लक्षावधी सौंदर्यरुपकांच्या दर्शनाने आपण मोहित होतो. 'ऋतूस्पर्श' चे आणखी वैशिष्ट्य असे की ते तथाकथीत चिंतनाने वगैरे जगवले नाही तर निसर्गातले खास असे सांगतांना क्रूर, करूण विनाशी, असेही दाखवतात. 'कोवळी ऊन्हे', 'ऋतूंचा चेहरा बदलतांना','पानगळ' अशा ललितबंधांतून या अनुभवांचा प्रत्यय येतो.
पेठकरांना जीवनाचे आकर्षण आहे. निसर्ग आणि त्यातली सजीव निर्जीव सृष्टी यांच्याकडे ते कुतूहलाने बघतात. स्पर्श करतात. भरभरून अनुभवलेल्या आणि सुक्ष्मपणे हाताळलेल्या निसर्गाच्या विविध रुपांचे हे प्रवाहे दर्शन आहे. पावसावरचे आणि श्रावणाचे लेख बघीतले की हे पटते. लेखकाचा हा विमुक्त प्रवास आहे. अनुभवांचे भार जड झाले, की असे ऋतूस्पर्श मनात झुलू लागतात. ललित लेखनाचा केवळ भावनेशीच नव्हे, तर देहाशी ब आगच्या मागच्या जीवनाशीही घनिष्ट संबंध असतो. हा अनुभव जेवढा बळ देणारा तेवढा अविष्कार समर्थ होतो. पेठकरंच्या तरल अनुभवांशी वाचक तसाच सामर्थ्यानिशी भिडतो. स्पर्शितो. आणि तनामनाला समाधान दिल्याबद्द्ल लेखकाच्या प्रेमात पडतो. आणि फुलाने फुलाला टिपावे तसे त्यांच्या ललितबंधांशी एकरूप होतो.

- डॉ.सुलभा हेर्लेकर
१२२. अभ्यंकर रोड
धंतोली, नागपूर.

Tuesday, May 22, 2007

On "Rutu Sparsha" - Chaitanya Deshpande

Perpetual Literature stands for Nature.

“Instead of turning unaided facing nature’s zeal, just give up and have the flavor, but while experiencing the excitement, try not to involve in the phony proposes given by maudlin dreams of the season as these assaults of the season are accustomed with time. Time never surrenders to the feathery rule of season. Seasons can influence a moment or a span, but when time comes, season also compelled to leave. They belong to no one. Not even to themselves. Season is a sweet dream of Nature. ”

These are the opening lines of Shyam Pethkar’s “Rutu Sparsha”; the outstanding anthology of fictional pieces subject to the mixture of various essences of nature, for this book shows Shyam Pethkar at his very best – a veritable paean of praise for the beauty and bounty of nature, unsullied by any worry or care.

It’s about all petals of bloom of nature. Not only the seasonal makeover of nature, but also its effects on perceptive human hearts have been revealed with excellence by the writer. “Rutu Sparsha “is a lifetime experience of an observant, sensitive, and accomplished writer which provides the same to the readers having living and feeling hearts inside their bodies. It forms an influence which makes you think regarding what you are trailing while struggling to gain the worldly triumphs.

Right from the origin of ancient civilization in India, we are strongly attached with nature. Our culture and customs came into existence regarding the Nature’s mood. With the progress of bits and pieces, regrettably we are forgetting that we are also the element of Nature. This work exposes melancholy of present Indian urban working youth, which is moved to the town from countryside only for their bread and butter and strongly miss the natural gloom under which they developed. The town life is unable to idolize various figures of nature and this made them homesick. But, this is not only about the nostalgia of town life. It’s a worth praising expression of nature’s magnificence and mastery over human conducts and culture. It confirms the spiritual association of nature to human sensitivity. That’s what our Vedas and Upanishads do.
"The excellence of every art is its intensity, capable of making all disagreeable evaporate from their being in close relationship with Beauty and Truth." This is John Keats’s quote and ideal for the fineness of “Rutu Sparsha.” While experiencing this piece of literature, we realize ourselves as an inseparable part of nature and this feeling bound us to believe that this world belongs to me. This book lifts us right from the countryside to the “Citizenship of World.” We conclude while confessing nature’s supremacy over us and bow in front of Almighty Nature.


The foam frilled waves,
The deep dark caves,
The success smiles
and
Failure weeps
The music of dawn
The evening song
The huge sky
kissing,
Mountain tips.

The joy of love
The cry of
death
The strong atheism
And super-strong faith

Every
satisfaction and every pain
Every fragment of every grain
Every drop of
falling rain and
Every word from poetic brain

All belong to
you.
My heart, My mind,
My life
My soul… Too


“Rutu Sparsha” is a Perpetual Literature.


-Chaitanya S Deshpande

Sunday, May 20, 2007

शिशिराचे चाळे

उन्हाला वसंताची चाहूल लागत असतांना शिशिर पानापानांमधून गळतीला लागला असतो. पानांचे पानपण सांभाळतांना वार्र्याचीही दमछाक होत असते. मग वार्र्याची वावटळ होते. गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडायला लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात. पाणी केव्हा तोडायचं हे त्यांना शिकवावं लागत नाही. खरंतर ज्यांना पिकवावं लागतं त्यांना शिकवावं लागत नाही.
हवा हळूवार कोरडी होते आणि पहाटेचं धूकं संकोच करू लागतं. पहाट अशी संकोचली, की गव्हाच्या ओंब्या दमदार दाण्यांनी ओथंबतात. गव्हाच्या रानातले बगळे गारवा सरत असतांना दूर रानात तळ्याच्या काठी समाधी लावायला निघून जातात. पाचोळा उडवीत वावटळ भर दुपारची गावात शिरते. गावतले सुगीचे सारेच संदर्भ आता संपलेले. सुगीचा हिशेबही आता जूना झालेला. घेण्यापेक्षा देण्याच्याच भावाने गाव पार वाकून गेलेलं. असा येण्या-जाण्याचा हिशेब गावाला ठेवता येत नाही. गावाचं घेणं तसं देण्यासाठीच असतं. संचीत सरलं तरी देणं मात्र बाकिच असतं. गावाची अशी वजाबाकी सुरु असतांना ऋतूचीत्र पालटून जातं.
गावात अशी वजाबाकी सुरु असतांना शिशिराला म्हातारचळ सुचलेलं. ऋतूंचे म्हातारचाळे तसे देखणे असतात, पण मनाच्या तळाशी एक एक विषण्ण शांतता पसरविणारे असतात. झाडांकडे आता गाळायलाही पानं नसतात. झाडं बेटी भलतीच करंटी वाटू लागतात. पण ऋतूंनी दिलेल्या करंटेपणातूनच वसंत फुलत असतो. गळून पडायला काहिच उरलं नाही, की मगच नवी पालवी फुटत असते. गमवायला काही शिल्लक नसलेलाच कमवू शकतो. शिशिर सरत असतांना झाडं फुलांनी पानांना भागत असतात. अशा दिवसातली दुपार तशी केविलवाणी असते. गावाचे शेतंही ओकीबोकी झालेली. पौषातल्या अश्या एखाद्या दुपारी पाखरं अचानक गावाकडे पाठ फिरवतात. सुगी सरली की, गावाकडे पाठ फिरवण्याची शिकवण पाखरांना पंख पसरण्याआधीच देण्यात येते. एखादी एकट टिटवी निसवलेल्या रानात मनातली हिरवळ डोळ्यात आणून सुगीचे संदर्भ टिपत असते. अशावेळी गावाला दुपारची झोप येत नाही. पण संपन्न सुस्तावलेपणाचा आव आणून गाव डोळे मिटून गप्पगार पहुडलेलं असतं. कडुनिंबाचे अखेरची काही पानं वार्र्याला दोष देत उगाच भिरभिरत जमिनिवर कोसळत असतात. पानांचा जीव जमिनीवर अंथरून झाडं अशी निष्पर्ण उभी असताना, भर दुपारी गावातल्या न्हात्या-धूत्या झालेल्या मुली कडुनिंबाच्या पारावर अंघोळ करीत बसतात. टिक्करबिल्ला खेळायच्या खापरानं त्या अंग घासत असतांना कडुनिंबाची नजर डोळ्यांसकट त्यांच्या वक्षावर गळून पडते. मुलींचा टिक्करबिल्ला केव्हाच सरलेला. पण खेळतांना बांधलेली रेघोट्यांची घरं मात्र डोळ्यांच्या पापणकाठावर सजीव झालेली. मुलींचं असं खेळण्या-बागडण्याचं वय शिशिराच्या अशा दुपारीच का सरतं, ते कळत नाही. अंगी वसंत फुलत असतांना शैशवाची कोवळी पानं अशी झडून गेलेली असतात.
गावाने पानगळ अशी आंगोपांगी गोंदवून घेवू नये. पानगळीची पुरेशी नोंद घेउन ती विसरायची असते. संदर्भासह जपुउन ठेवावे असे शिशिरात काहीच घडत नाही. वसंत तिच्या केसांत माळायचा नसतो, तसा शिशिरही डोळ्यांत भरायचा नसतो. तिन्ही ऋतू त्यांच्या संचीतासह क्षितिजावर पसरलेले असतात. पानगळही अशी हळूच मनात घर करते. झाडांचा धीर सुटला की पानगळ सुरु होते. ऋतूंचे असे गहिवर वहीच्या पानात जपून ठेवले की वहीची ती पानं केव्हाही छळतात. नको त्या वेळी वहीची पानं फडफडतात अन ऐन वसंतातही शिशिराचे चाळे सुरु होतात. हळद-कुंकू सांडवून पौषवारे वाळल्या पानांच्या ढिगामध्ये हरवून जातात. गारठवून टाकणारे वेडे वारे घेऊन माघ येतो. कापर्र्या वार्र्यांनी झाड६ चळाचळा कापतात. पांघरायला पानंही नसतात. हिरवेपण अनावर झालं की असं होणारच. मतलबी शुभ्र झळाळी घेऊन बगळे मग वृक्षांना सलाम ठोकतात. पानांच्या आठवणीत उसासे टाकणार्र्या झाडांच्या कोरड्या फांद्यांवर कावळ्यांची घरटी करपलेल्या वारकर्र्यांच्या कपाळी लावलेल्या बुक्क्यागत दिसतात. माघातले वारे कावळ्यांच्या घरट्यांशी छेडखानी करतात. ऋतू असे बेइमान झाले की गावाशी ईमान बाळगून असणारी ती काळी पाखरं बेभान होतात. वार्र्यावर चोचींनी प्रहार करण्याचा वेडेपणा करतात. कावळ्याची अस्वस्थ कावकाव या दिवसांत दुपार करपवून टाकते. दुपारच्या वामकुक्षीनंतर लगबगीनं दुकानाकडे जाणारा नामदेव शिंपी हातांचे वल्हे करून स्वतःच्याच डोक्यावरून फिरवीत जातो. माणसांच्या करंटेपणानेच गावावर पानगळ आली, हा त्या काळ्या पाखरांचा समज गावाच्या तीन पिढ्यांना काढता आलेला नाही. त्यांची घरटी असलेल्या निष्पर्ण झाडाखालून जाताना भागाबुढीचा डोळा कावळ्यांनी फोडल्याची कथा मात्र गाव वर्षानुवर्षे नव्या पिढीला सरत्या शिशिरात सांगत असते. भागाबुढी याच गावात नक्की रहायची का, ते कुणीच विचारत नाही. शिशिर चाळ्यांनी कावळे चीडले असतांना असले प्रश्न गावाला पडत नाही. कोळपलेल्या गढीच्या बुरुजावर अनाहूत वाढलेल्या कलत्या पिंपळावर बसून एका डोळ्याची कावळी मात्र बुबूळ गरगरा फिरवीत उजाडलेल्या गावाकडे बघत खंतावत असते. काटक्या झालेल्या झाडांवरील घरात वसंताचा गळा वाढवणार्र्या पाखरांनी शिशिराच्या चाळ्याची खंत करायची नसते. आपल्याच घरट्यात वसंत वाढतोय, हे पाखरांना कळू नये, हे पाखरंच प्राक्तन असतं. सुगी आटोपली की नदीचं पाणी आटण्याआधी घराची डागडुजी करून घ्यायची असते. मग माणसंही कामाला लागतात. गावच्या गढीची माती दुपारच्या एकान्तात चोरून नेतात. गावचा पाटिल म्हणे तालेवार होता. वाटण्या झाल्या तेव्हा तराजूने तोलून सोने वारसदारांमध्ये विभागले होते. गढीच्या खचलेल्या जाडजूड भिंतींमध्ये म्हणे सोन्याच्या लगडी लपवून ठेवल्या होत्या. पानगळीतल्या भयाण रात्री कुणीतरी एकटाच अंधारालाही ओळख न देता गढी खोदून सोन्याचा शोध घेतो. सुखाच्या शोधाचे असे कितीतरी खड्डे गढीभर पसरलेले आहेत. गढी आता पानं गाळून बसलेल्या झाडांसारखीच उजाड झालेली आहे.
पाटलाच्या गढीत वसंत कधी येणार, हा प्रश्न पाखरांनाही पडलेला. पाखरांच्या असंख्य पिढ्यांनी पाटलाच्या रंगमहालात उत्कट रसिकतेची मादक दरवळ बघीतली आहे. नशिबाची पानगळ आली आणि केवळ रसिकताच उरली. व्यक्त होण्यासाठी संपन्नता लागते. उपभोगाचे भोग मग पाटलाला छळू लागले. माघातल्या ओरबाडून टाकणार्र्या वार्र्यात शरीरही पिंजून निघालेले. मग रसिकता उपभोगाची दासी झाली. जीवनातले गुलजार वसंत छळतात अश्यावेळी! म्हातारा पाटिल वसंताच्या आठवणींनी बेभान व्हायचा. मग गावातल्या गरत्या घरच्या घरंदाज गृहिणींच्या पायातही चाळ बांधायला म्हातारा पाटिल धावू लागला. गावाच्या चीरेबंदीपणाला असे तडे जाऊ लागले. पाटलाच्या तालेवारपणाखाली वाकलेले गाव एक दिवस ताठ झाले. श्रीमंतीच्या आठवणीत खंगलेल्या पिढीनंही म्हातार्र्याविरुद्ध बंड केले. म्हातारा पाटिल आता गढीवरच्या वाड्यातल्या वरच्या खोलीत बंदिस्त. पानगळीने हैराण झालेल्या भणभणत्या माध्यान्हीला वेड्या पाटलाच्या डोळ्यांत वसंत नाचू लागतो. भोगलेल्या स्त्रीयांच्या नावाने पाटलाची कावकाव सुरु होते. वसंतसेनेच्या अनावृत्त अवयवांच्या रसभरीत वर्णनांनी पाटलांची बेताल बडबडही तालबद्ध होते.
शिशिराची पानगळ झेलत वसंत तेव्हा गावतळ्याकाठी निवांत बसलेला असतो. शिशिराचा प्रवेश संपला, की त्यालाच रंगमंचावर यायचे असते. असे प्रवेश ऋतूंना चुकूनही चुकवता येत नाहीत.

Wednesday, May 16, 2007

पानगळ.

पानगळ तशी आपसूकच आल्यासारखी येते. पानगळ आली की, झाडं उत्तरायणाची वाट बघत शरपंजरी पडलेल्या जख्ख योद्धयासारखी दिसू लागतात. निशःब्द वाटेवरून पौषातल्या झोंबर्र्या दूपारी जातांना एखादं पिकलं पान गळून अंगावर पडलं, की मृत्युला रोखून शरपंजरी पडलेल्या त्या योद्धयाची अलगद आठवण येतेच. मग सुर्याच्या चढत्या तापमानाची ही सुरूवातच डोक्यावरून मायेचं छत्र काढून घेतल्यागत उदास होते. पण आलेला ऋतू स्विकारणं, हे आपलं प्राक्तन असतं. कारण कोणताच ऋतू अपघाताने येत नाही. औपचारीकपणे तर येतच नाही. प्रत्येक ऋतू म्हणजे सृष्टीच्या संचीताचं तीच्या तिच्या झोळीत पडलेलं दान असतं. कापत जाणारी उन्हं कितीही नकोशी झाली, तरीही ती नाकारता येत नाहीत. पावसानं आयुष्याचा चीखल केला, तरीही त्याला पडू नको असं सांगणारे आपण कुणीही नसतो. डोळ्यांना रडू नका असंही सांगण्याच आपल्याला भान नसतं. आभाळानं दिलेलें कुठंलंच दान आपल्याला नाकारता येत नाही. पानगळही!
आभाळाला नको, असं सांगता येत नाही. आपण तसं सांगू शकत नाही. सांगूही नये. पानगळ म्हणूनच अनिवार्यपणे येते. गळणारी पानं तूमच्या नकाराला मोजत नाहीत. तशी गळणारी पानं आपल्यालाही मोजता येत नाहीत. फारफार तर झोपाळ्यांवर झूलण्याच्या वयात, ईतरांची नजर चुकवून एकट्या दूपारी झाडावरून सुटलेलं, वार्र्यावर भिरभिरत येणारं पान हाताच्या ओंजळीत वरचे वर पकडून वहीच्या कप्प्यात ठेवता येतं. पण उमलत्या, कोवळ्या कुंवार वयात असं करतांना आपण सावध असायला हवं. गळतीला लागलेलं गाव उमलत्या जीवांच्या इतक्या हळव्या, नाजूक क्षणांवर नजर ठेवून असतं. खरे तर प्रत्येकाच्या डोळ्यांत एक स्वप्नांची राजकुमारी असते. स्वप्नांचा राजकुमार असतो. स्वप्नांचं हे अवतरण कुणीतरी कुणासाठीतरी लिहून ठेवतो. अगदी स्वतःचं प्राक्तन समजून. प्राक्तन म्हणजे संचीताचा साठा असतो, हे विसरून आपण त्या खेळाचे खेळी होतो. मग "घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी वणवणतो पोटासाठी तो राजपुत्र अलबेला" हे वास्तव समोर येतं.
हा शिशिर तसा स्वप्नांचा ऋतू आहे. मावळत्या मस्तीची गुलाबी साय पांघरून थंडीच्या पांघरूणातून गाव वास्तवाला आकार देत निवांत निजलेले असते. बंद दारे आणि थोराड भिंतींना बोचरे वारे झोंबत असतात. गावाचे श्वासच तेवढे ऐकू येतात. अशा घाबरट शांततेत जून्या वाड्याच्या पडक्या खिंडारातून पोस्टमन हळूच सायकल बाहेर काढतो. गारगार वार्र्यानं उन्हालाही कापरं भरलेलं असतं. पिंपळपाराजवळ रात्र अंगावरून गेल्याने थिजत चाललेली शेकोटी शेवटचं धूमसत असते. तो तिच्यात प्राणपणानं फुंकर घालतो. पिंपळाची गळालेली पाने त्यात टाकतो आणि धगधगू लागतो. गाव तरंग नसलेल्या तलावासारखं शांत असतं. गावचा थीजलेला तलाव मात्र पौषवार्र्याच्या संगतीनं थरथरू लागलेला. पोस्टमन त्याच्या विटलेल्या रंगाच्या बॅगमधून धूरकट झालेल्या काचेचा चष्मा काढतो. तुटलेल्या दांडीच्या ठीकाणी बांधलेला धागा डाव्या कानात अडकवून पत्र वाचतो. तशी दुसर्र्यांची पत्र वाचू नयेत. पण सासुरवाशिणीची पत्रं पानगळीला बळी पडलेल्या पानांसारखीच. गाव अशा सासुरवाशिणींकडे दुर्लक्ष करतो. दर पानगळीच्या मोसमात गावतळं अशा एकातरी सासुरवाशिणीला आपल्या उदरात घेतं. अशा कोवळ्या पानगळीकडे कुणाचंच लक्ष नसतं म्हणून अशी पत्रं वाचतांना पोस्टमनचे डोळे थिजतात. पण गावच्या विवंचना वेगळ्या असतात.
पांढर्र्या कापसाच्या पांढर्र्या पायाच्या सुगीचा हवालदिल हिशेब करीत ऐन दुपारच्या वेळी गाव एखाद्या बेजबाबदार पोरासारखं शांत निजलं असतं. स्वप्नांची राजकुमारी वाड्याच्या परसात खरकटी भांडी घासायला काढते. अशावेळी एकाएकी एक वार्र्याची जोरदार लकेर येते आणि शेवग्याच्या झाडांवरून तुरीच्या डाळीच्या आकाराएवढ्या पिवळ्या पानांचा एक पदर बाहेर येतो. सर्वांचा डोळा चूकवून पानगळ अशी गावात आणि गावाबाहेरही येते.
पानगळ गावात येते तेव्हा गाव उघडं बोडखं दिसू लागतं. बाप मेलेल्या मुलासारखी, जंगलात झाडांना सवयच असते बिनभरवश्याच्या मोसमांची. नेमकी याचवेळी निवडूंगाला फूलं येतात. निवडुंगाच्या काटेदार पानांचं हिरवेपण डोळ्यांत खुपू नये म्हणून शिशिरातले शहाणे वारे, कडुनिंबाच्या पानांची बेसरबिंदी निवडुंगाच्या काट्यावर अलगद टोचून देतात. कडुनिंबाची पानं पानगळीच्या मोसमात श्रावणातल्या झडीसारखी नित्यनेमानं बरसत असतात. अंगणात टिक्करबिल्ला खेळणार्र्या परकरातल्या पोरी, कडुनिंबाची इवली इवली पानं वरच्या वर हवेत झेलण्याचा खेळ करतात. दुपार टळटळीत होण्याआधी जिच्या ओच्यात जास्त पानं जमा होतील तिचा सगुण सिद्ध होतो, हे त्यांना परंपरेनं माहीत झालेलं असतं. पुढे त्याच पोरी न्हात्या-धुत्या झाल्या की याच कडुनिंबाखाली ताट्याच्या छत नसलेल्या न्हाणीघरात भर दुपारच्या अंघोळ करीत बसतात. आपल्याच नादात खाराच्या तुकड्याने पायाचे तळवे घासत उबदार पाण्याच्या मंद मंद स्वप्नात घरंगळत असतात. शिशिराची शिरशिरी मग तरूण अंगाच्या प्रत्येक काट्यावर एक एक रोप अलगद लावून टाकते.
सांजेला पांढर्र्याशुभ्र बगळ्यांची माळ सराईतपणे मारुतीच्या देवळावरून उडून जाते. पिंपळाच्या शेंड्यावर मग पांढर्र्या पानांची आरास होते. गावतल्या तरण्या पोरी याच वेळी गावमारूतीला दिवा टाकायला जातात. पिंपळावरचा कावळा उगाच डोळा मिटून घेतो. आपण समजतो वसंत आला. खरेतर आपले पानपण फांदीला भारी झाले की पानगळ ऐन भरात येते. मग आपण दगडांचे शेजारी होतो. ज्यांना स्वप्नांचे डोळे आहेत, त्यांनी ही पानगळ आपल्या श्वासांमध्ये भरून घेतली पाहिजे म्हणजे पुढे आयुष्यात काही पडझड झालीच, तर पानगळीचे हे संदर्भ काठीसारखे हातात धरून स्वतःला सावरता येते.
पुढे ते गावात आले. गावाबाहेरच्या त्या कट्ट्यावर कंबरेपर्यंत पानांचा ढीग साचेपर्यंत बसून राहिलेत. त्या ढिगातून सळसळत साप बाहेर यायचेत. बाबा तसेच बसून होते. विरक्त. वेगळे. त्यांना न्यायला त्यांच्या सासरची मंडळी आली वरात घेउन. ती वरात नदिच्या डोहात बुडली. बाबा पुढे तेथेच राहिले दुसर्र्या पानगळीपर्यंत. तोपर्यंत त्यांच्या अंगावरची पानं काळी पडली होती. म्हणून ते काली कंबलवाले बाबा. ह्या कथा प्रेमाच्या आहेत, की... एक चाफ्याचं झाड आहे. शुभ्र फुलांनी डवरलेलं. पानगळीत झाडाला नुसतीच फुलं असतात. निवडुंग आणि चाफा यांनाच फक्त पानगळीला फसवता येतं. इतर झाडं पानगळीला शरण जातात. नुसतीच शरण जात नाहित तर कह्यात जातात. हे कह्यात जाणं ईतकं पराकोटीचं असतं,की झाडे उन्मनी अवस्थेत येतात. एखाद्या बोडख्या संन्याशासारखे, कुठल्यातरी धुंदीचे गाणे गात बेभान होतात. आपल्या अ&गावरीला पानांचे एकेक वस्त्र उतरवून टाकतात. अनंग होतात. मग गाव उगीच उदास उदास वाटू लागतं. उगीच वेडावल्यासारखं वाटतं.
हे असं असलं तरी हे असं रहात नाही. मग हळूच एखाद्या पहाटे कडुलिंबाचा फुलांचा सुवास येतो. ऋतू झपकन झपताल घेउन समेवर येतो. पहाटे शेतावर जावं, तर पळसाच्या झाडावर भगव्या रंगाच्या अंगठ्याएवढ्या कूयर्र्या बाहेर आलेल्या असतात. कत्थ्या रंगाची एक लव सार्र्या सृष्टीवर पसरली असते.
आणि मग आपल्या लक्षात येतं की, आपल्या कह्यात आलेल्या सृष्टीला या पानगळीने हिरव्या स्वप्नांचे डोळे दिले आहेत. इतक्यात कुठून तरी एक कोकीळ स्वर येतो आणि सारेच वास्तवातल्या स्वप्नांत गाऊ लागतात. "आला वसंत आला वसंत, आला वसंत आला " खेळीयाचा एक खेळ संपलेला असतो. पानगळीचं हे बाळंतपण किती कठीण असतं नाही?