Wednesday, June 20, 2007

पहिला पाऊस

वार्र्याचे श्वास ओलसर झाले की, मग पाऊस येतो. शिशिरात झाडं बोडकी होतात. वसंतात झाडं पानंपानं होतात. झाडांच्या काळसर निब्बर खोडांवर फुटलेली ही कोवळी हिरवी लव सावली धरायला लागली की, मग पावसाचे थेंब तोलून धरण्याची ताकद पानांमध्ये येते. पाऊस असा नेमक्या वेळी येतो. अवघ्या सजीवांची पाळंमुळं तहानली की, पाऊस येतो अन पाणी धरून ठेवायला जीथं मुळं असतील तिथेच टिकून राहतो. पावसाची हळवी, ओली, रौद्र, भिषण रुपं असू शकतात. पण पहिल्या पावसाचं मात्र तसं नसतं. जन्मदात्याबद्दल कृतज्ञतेचीही ओळख नसलेल्या अर्भकासारखा तो निरभ्र, निरागस असतो. हा पाऊस मनी ध्यानी नसतांना येतो. येईल, येईल अशी आशा विझत गेल्यावर, चिडचिड्या उन्हाशी परत जमवून घेण्याचा प्रयत्न करतांना मग पाऊस येतो.विरहाचे तडे गेलेल्या जमिनिचे उसासलेपण हुंगून पाऊस निघून जातो; पण येण्याचं वचन देऊन. रोडावलेल्या नदीच्या फाटक्या उराला थेंब थेंब टाके देतांना, पाऊस नदिच्या ओटीत पाण्याच्या दोन ओंजळी ओतून रेतीत पाय गाडून बसतो. अश्यावेळी नदिकाठची समाधिस्थ शिळा देखील हलकी होते. पावसाने नदीच्या वाळूत घर केलं की, नदीचा बांधा सुडौल होतो. पण एक होते- पहिल्याच पावसात नदिची वाट निसरडी होते. पावसाची नजर चुकवून आलेल्या एखाद्या चावट संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा बहाणा कुणी करू नये.
पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. नवनिर्मितीचं हे बीज कुठेही असू शकतं. कसंही ते येऊ शकतं. डोळ्यांतल्या स्वप्नांची लिपी वाचण्याची कला जन्मजात अवगत असणार्र्या पाखरांच्या अस्तीत्त्वाशीच हे बीज सलगी करून असतं. पहिला पाऊस नेमकं ते हुडकून काढतो. परागंदा झालेल्या वासरांनी वाळीत टाकलेल्या गावातल्या वाड्याच्या कौलारू छतावरही मग पिंपळ साकारतो. कौलारू घरांच्या छतावर हिरवळ दाटून येते. हे निर्मितीचं बिज कुठेही असू शकतं. तुमच्या-आमच्या हृदयातही. म्हणूनच सहनशक्तीची परिक्षा घेऊन आलेला पहिला पाऊस पाऊसबावर्र्या मनात कविता जागवितो. नांगरलेल्या शेतातील तासांमधून हा पाऊस पळत सुटतो.
जीवनात अनेक पावसाळे पाहणार्र्या जख्ख जीवांना देखील पहिला पाऊस भेटतोच असे नाही. अवघा पावसाळा डोक्यावर घेत मोकळ्या आकाशाखाली फीरत राहिलं, तरी पहिला पाऊस भेटत नाही. हा पाऊस हटखोर असतो. पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्याचे मोती करता आले, तरच हा भेटतो. डोळ्यांत ढग साठवण्याचे कसब ज्याला साधले त्यालाच हा पाऊस भेटतो. मग तो कधीकधी पावसाळा सरतांनाही भेटतो. चिंबचिंब भिजून रिमझिमत राहण्याची शपथ तो देऊन जातो. एखाद्या गंगापूत्रालाही तो समरांगणी शरपंजरी पडला असतांना भेटतो. कुणाला भेटायचंच असेल तर तो ग्रीष्माच्या परसात घुसखोरी करूनही भेटतो. ज्याची नाळ मातीतच गाडली आहे, असे जीव अस्तीत्त्व नांगरून बसतात. ओसाड आभाळाकडे बघत त्यांच्या डोळ्यांमध्ये ग्रीष्म दाटून येतो. डोळे मीटताच मग पावसाच्या आठवणींचे तप्त कढ पापण्यांच्या कनातीतून बाहेर पडतात. अश्या हळव्या वेळी हा पाऊस अनवाणी पायांनी शेत तूडवीत ते कढ झेलून घेतो. असा पाऊस मग आभाळभर होतो. बांधावरच्या बूंध्याला टेकून पावसाची वाट पाहणार्र्याच्या आसूसल्या चेहर्र्याला पावसाचे थेंब कुरवाळतात. शेतामध्ये मग गोरा कुंभार नाचू लागतो. जमीन दाणे मागू लागते. अर्थात हे मागणं भरभरून देण्यासाठी असतं. घरट्यांवर पंख अंथरून पाखरं अंगाई गातात. मातीशी नातं असणार्र्यांची मग धावपळ सुरू होते. बैलांच्या पावलांनी जमीन लेकूरवाळी होते. चंद्रमौळी झोपडीचं छतही मग गोवर्धन होतं. पावसाच्या सार्र्या व्यथा छत झेलून घेतं. अशा पावसाला नाविन्याचा ध्यास असतो. पाऊस मग झोपडीच्या छतातून आत शिरतो. दुधपितं लेकरू आईजवळ सरकतं आणि गोठ्यातल्या गाईच्या निळ्या डोळ्यांत हिरवं रान उगवतं.
हा पहिला पाऊस ओसरला की, कुपावर कारल्याचा वेल काट्यांशी बोलू लागतो. रान गारगार होतं. वारा चिंबचिंब होतो. अंगावरची धूळ झटकून झाडं, पहिल्या रात्रीनंतर नुकत्याच न्हालेल्या नवपरिणीत वधूसारखी संपृक्त टवटवीत दिसतात. कौलारू छतंही आरशासारखी चकचकीत होतात. पहिला पाऊस असा धूळ झटक़णारा असतो. शरीरावरची आणि मनावरची देखील.

पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पहिला पाऊस गावात येण्याआधी गावाने सुकी लाकडे जमवून ठेवावी. ऐन पावसाळ्यात गावात कुणी मेलेच, तर अडचण नको. मरणाचे स्मरण असे नेणिवेच्या पातळीवर असतेच. वाढत्या वयाबरोबर हे धूके अधीक गडद होऊ लागते. मरणाशी नजरभेट झाली, की डोळ्यांना कोवळे अंकूर फूटत नाहीत. पाऊस नेहमीचाच अनुभवायचा असेल, तर जिवंत माणसांनी जातिवंत डोळे हिरव्या पानांआड दडवून ठेवावे. नाहितर मग पाऊस जाणिवेच्या पातळीवर येतच नाही. पेशींनी अंकूरण्याचे नाकारले की, जीवांना पावसाची धुंदी चढत नाही. अश्यंना पहिला पाऊस भेटूच शकत नाही. जाणिवा जीवंत ठेवल्या की, पाऊस पहिला होवून भेटतो. हा पाऊस असा कधीच भेटला नव्हता. ऐन पावसात इमारतीच्या गच्चीवर ऊभे राहून तीच्या केसात फुलं माळतांना सुद्धा पहिला पाऊस भेटला नव्हता. पाऊस कळायला लागण्यासाठी त्याची ओळख असावी लागते. ती करून घ्यावी लागते. पावसाचेही संस्कार करावे लागतात.
साडेतीन वर्षाची चीमुरडी. यंदा पाऊस कधी येणार?, हा प्रश्न घेऊन भिरभिरत होती. वार्र्याला सदाफूलीची ओंजळभर फुलं देऊन तीने त्यालाही प्रश्न विचारला होता. कोरडा वारा मुकपणे तीच्या बटांमध्ये बोटं फिरवून निघून गेला. प्रश्न कायम होता आणि ढगांकडेही उत्तर नव्हते. शापित गंधर्वाने आपल्या सखीसाठी मेघाला दिलेला निरोपही ईतका आर्त नसावा. पाऊस न अनुभवलेली चिमुरडी पावसाची वार्ता विचारत होती. तिला ईवल्याश्या मुठीत पाऊस साठवून ठेवायचा होता. अखेर तीच्या डोळ्यांच्या कडांवर हा प्रश्न सुकून गेला. गोबर्र्या गालांवर सुकलेल्या पाण्याची नक्षी तरारली, पण पाऊस आलाच नाही. घराच्या परसदारी, तूळशीपाशी, हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून ती बसून राहिली आणि वार्र्यालाही कळू न देता तो आला. एका टपोर्या थेंबाने कळूच तीच्या डोक्यावर टपली मारली. काय आहे? मग पाण्याच्या थेंबांची गर्दीच झाली. अंगणात एकेक थेंब जमिनित रूतून बसला. अगदी इतर वेळी तिने ते थेंब रांगोळी काढण्यासाठीच वापरले असते. थेंबांनी तीला गोंजारायला सुरूवात केली अन ती आनंदाने चित्कारली - "पाऊस आला!" तान्ह्या पावसात चिमुकलीसोबत भिजतांना अचानक जाणवलं, हा पहिला पाऊस आहे. पाऊसधारांनी बावरलेली ती, तिने इवल्याश्या हातांनी गळ्याभोवती गच्च मिठी मारली. कमरेभोवती पायांचा वेढा घातला अन पाऊसच कडेवर आल्यागत वाटले.
पहिला पाऊस असा अचानक भेटतो. साधना असावी लागते. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो. कधी तीला पाऊस भेटतो, तर कधी त्याला. दोघांनाही एकाच वेळी पाऊस भेटणं हा दैवदुर्लभ योग आहे. तिच्या मोकळ्या केसांमधून ओघळणारे पावसाचे मोती तो ओंजळीत वेचतो, तेव्हा पाऊस पहिटकर असतो. तिच्या केसांच्या सरी मग जीवन क्यापून टाकतात. पाऊस मग सरी विंचरून वेणी घालतो. हवंहवंसं बंधन घालणार्र्या शृंखलाच होतात तीच्या बटा. ते बंधन असलं तरी रेशमी असतं. आकाशी असतं. पाऊस असा भेटण्याचा तो एकच क्षण असतो. त्यानंतर त्याने तिचे केस पिळून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस येइल, पण तो पहिला नसेल.
पहिला पाऊस भेटतो रानात. मनात. आईच्या स्तनात. पहिला पाऊस मनाच्या चोरकप्प्यात दबा धरून बसलेला असतो. तो भेटण्यासाठी पावसाळाच असावा लागतो, असे नाही. रणरणत्या दुपारी दुसर्र्याचं उजागर सौभाग्य झालेली त्याची 'ती' त्याला भेटते, तेव्हा मनात दबा धरून बसलेला पहिला पाऊस अचानक कोसळू लागतो. अशा वेळी सावरणं कठीण असतं. पाऊस धरवत नाही आणि चिंब होता येत नाही, अशी केविलवाणी अवस्था असते. घरासमोरील अंगणात शेवंतीचं रोपटं लावतांना पाऊस हातातून वाट काढतो. ओणवं होऊन शेतात कापूस वेचतांना हाच पाऊस पाठीवर स्वार होतो. एखाद्या अंधार्र्या रात्री वारा खिडकीच्या तावदानांना धडका देत असतो आणि घरात आईचा निष्प्राण देह पडला असतो. त्या काजळ्या रात्रीही पहिला पाऊस कुंपणापाशी खिन्न बसला असतो. या पहिल्या पावसाची फुलं होतात. ती माळून ठेवता यायला हवीत.
Posted by Picasa

No comments: