Friday, December 21, 2007

"ऋतूस्पर्श" कार श्याम पेठकरांना भैरोरतन दमाणि पुरस्कार प्रदान!




भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार त्यांच्यासह यशोधरा काटकर यांना "थर्ड पर्सन' या कथासंग्रहाबद्दल आणि भिन्न' कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे होते. उद्योगपती प्रेमरतन दमाणी, नवरतन दमाणी, पुरस्कार समितीचे निमंत्रक रामदास फुटाणे आणि महापौर अरुणा वाकसे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रु.२५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण गांधीजींच्या विचाराकडे पाठ फिरवली, पण आपल्याला खाते- पिते, समृध्द गाव उभे करायचे असेल तर कचकड्याच्या आयुष्यापासून दूर जाऊन निसर्गाकडे वाटचाल केली पाहिजे, असे मत लेखक श्‍याम पेठकर यांनी व्यक्त केले. झाडांचे हात, वेलींची साथ आणि फुलांची पायवाट सोडून दिल्याने निर्माण झालेली आत्महत्या करायला लावणारी स्थिती बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

विशिष्ट लेखनाचे साचे मोडून टाकणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांची निवड पुरस्कारासाठी केल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द.हातकणंगलेकर यांनी पुरस्कार निवड समितीचे कौतूक केले. दाहक वास्तवाला भिडणाऱ्या लेखकांची नवी पिढी निर्माण होत आहे, त्याचे समाधान होत आहे, असे ते म्हणाले. मराठी साहित्यात या तीन पुस्तकांनी क्रांती घडवली आहे, असे नमूद करून केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकातील वास्तवाच्या आगीचे चटके दाहक असल्याचे सांगितले.

प्रारंभी उद्योगपती नवरतन दमाणी यांनी प्रास्तविक केले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. निवड समितीचे सदस्य कवी दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, द.ता.भोसले, शरदकुमार एकबोटे, डॉ. गीता जोशी, राजेंद्र दास यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Sunday, December 2, 2007

ऋतुस्पर्श ला प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी पुरस्कार...


श्‍याम पेठकर यांचा ‘ ऋतुस्पर्श ’ हा ललित लेखसंग्रह यांना यंदाचा मराठी साहित्यात प्रतिष्ठेचा मानला जाणारा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समिताचे अध्यक्ष, उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरात ही घोषणा केली. पंधरा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे एकोणिसावे वर्ष आहे.
१६ डिसेंबर रोजी इथल्या हुतात्मा स्मृती मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येतील.
पुरस्कार वितरण समारंभानंतर रात्री नामवंत गझलकारांच्या गझलांचा "आभाळ चांदण्यांचे' हा कार्यक्रम होणार आहे. माधव भागवत, सुचिता भागवत यांचे गायन आणि भाऊ मराठे यांचे निवेदन यात असेल.
पुरस्कार निवड समितीत दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. द. ता. भोसले, शरदकुमार एकबोटे, प्रा. राजेंद्र दास व डॉ. गीता जोशी यांचा समावेश आहे. सुमारे दिडशेहुन अधीक साहित्यकृतींतुन या पुरस्कारासाठी ऋतुस्पर्श ची निवड करण्यात आलेली आहे. हलसगिकर यांनी सांगीतले, की सामाजीकता, संवेदनशीलता, विचार आणि लालित्य यांचा विचार करून यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यकृतींची निवड करण्य़ात आलेली आहे. श्याम पेठकरांचा ऋतुस्पर्श निसर्गातील विविध पैलुंचे रमणिय दर्शन वाचकांना घडवतो, असे ते म्हणाले.
यापुर्वी हा पुरस्कार मंगेश पाडगावकर, वसंत बापट, डॉ. निर्मलकुमार फडकुले,आदी मान्यवरांना मिळालेला आहे.
नागपुरातून मात्र केवळ कविवर्य ग्रेस आणि कवी लोकनाथ यशवंत यांनाच हा पुरस्कार मिळाला होता.
श्याम पेठकर हे हा पुरस्कार 'ललितसाहित्य' या क्षेत्रात मिळवणारे विदर्भातील पहिलेच लेखक आहेत. शिवाय पत्रकारीता या क्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती आहेत.

या उपलब्धीबद्दल श्याम पेठकरांचे हार्दीक अभिनंदन!