Thursday, July 31, 2008

सखीचा शोध

पहाटेचं धुकं दबा धरून बसलेलं असतं. एखाद्या सांजेला त्या दवबिंदूंनाही डोळे फुटतात. अशा एखाद्या स्नीग्ध संध्याकाळी विस्तीर्ण पटांगणावर पडून आभाळ डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करावा, डोळे हळूच मिटून घ्यावेत. मिटलेल्या डोळ्यात आभाळ साकारू लागतं. त्या आभाळात एक चेहरा उमटतो. तीच सखी असते.
प्रत्येकाच्या डोळ्याच्या किरमिजी पडद्यावर अगदी कळायला लागायच्या आधीपासून सखीचा चेहरा अस्पष्ट, धूसर दिसत असतो. वयाला जाग येते आणि फुलांच्या ताज्या सुगंधात न्हायलेली सखी गुणगुणायला लागते. पण सखीचा चेहरा काही स्पष्ट नसतो. मग दिवसाच्या गर्दीत काही अबोल चेहरे नजरेला स्पर्ष करून जातात. आपण मग स्वतःच्याही नकळत सखीचा चेहरा त्या अनोळखी चेहर्र्याशी जुळवून पाहतो. पण एखादा तरल फरकही आपल्याला त्या चेहर्र्यापासून विलग करतो. चेहर्र्यांचं काय? ते अनेक रूपांत येतात. चेहरा दिसला की डोळे मिटून सखीचा शोध सुरू होतो. एखादा चेहरा मग अगदी... अगदी... पापण्यांच्या चिरेबंदी तटबंदीआड लपवून ठेवलेल्या सखीच्या चेहर्र्यासारखा भासतो. असा चेहराच चोरून नेण्याची आपली गडबड विलोभनिय असते. त्यालाच कदाचीत प्रेम म्हणत असावेत.

बरेचदा गर्दीत आपल्याला भावलेल्या चेहर्र्याच्या मालकिणीची आपण सहज चोरी करतो. हळूहळू त्यावर हक्कही प्रस्थापित करतो... मालकी हक्क! पण मालकी हक्काची विखारी भावना आणि तो गाजवण्याची भूक भागली, की कळतं, की आपली फसगत झालेली आहे. एकदा असं कळायला लागल्यावर माणूस ज्ञानी होत नाही. पण शहाणा मात्र होतो. अशा शाहण्यांना कळतं. चेहरा म्हणजे सखी नव्हे. मालकी हक्क स्थापन करण्याची धडपड म्हणजे प्रेम नव्हे. ती केवळ भुकेजली हाव होती. सखी नावाच्या आत्मशोधाच्या मार्गात अडथळा आणणारी देहाची खाज. पण तोपर्यंत मनावर उपभोगाचे अन आसक्तीचे अनेक ओरखडे पडलेले असतात. टोकदार नखांनी ओरबाडणारेही आपणच. जखमाही आपल्याच. उर्वरीत अख्ख आयुष्य या जखमांवर मलम लावण्यात जातं. जखमा बर्र्या होत आल्या, की त्यांना परत भुकेची खाज सुटते. अश्यावेळी आपण स्वतःचीही नजर चुकवून अपराधीपणे त्या जखमा खाजवून घेतो. त्या अपराधातही सुख शोधतो. खपली निघते आणि वखवख वाढत जाते...

या प्रवासात काहींचा सखीचा शोध थांबतो. जे भुकेलाच सर्वस्व समजतात, त्यांना देहाचे उंबरे अडवतात. पण काहीजण मात्र सखीचा शोध सुरू ठेवतात. पदरी पडलेलं गुलाबाचं रोपटं जगत राहील, याची तजवीज करून सखीचा शोध घेत राहतात. ही प्रतारणा नव्हे. तेजाला नैतीक अनैतीकतेच्या रंगीत चौकडी नसतात. तेजातून अनेक रंग प्रस्फुटीत होतात. तेज मात्र रंगाच्या पलीकडचं असतं. सखीचंही नेमकं असंच असतं. सखीचा शोध अनंतापासून अनंतापर्यंत अव्याहत सुरुच असतो. देहाची बंधनं आणि यमनियम या शोधाला नसतात. आणि हा शोध संपलाच, तर मग आयुष्यात काय उरेल? प्रेम हे मिळवण्यात नाहीच, मिळवण्याच्या विजिगिषेत आहे. शोधच संपला, तर कुठल्याही देहाच्या चौकटीतील आयुष्याला अर्थच उरणार नाही. मग एखाद्या भाग्यवंताला सखी सापडली, तरीही फुलांच्या गर्दीत त्याने परत ती हरवून बसावी व शोध सूरू ठेवावा...

असेही नाही. सखी अंशाअंशाने भेटत राहते. भेटता भेटता हुलकावणी देते. सखी अंशतः जीथे प्रकट झाली (किमान तसा भास झाला) तिथे त्या देहाचं आपण देउळ बांधतो. मग पुजा सुरु होते. पूजा डोळे बंद करून, हात जोडूनच करायची असते. डोळे बंद केले, की बंद डोळ्यांआडच्या अंधारात सखीचा चंद्र उगवतो. आपण समजतो, ते देवळाचं सामर्थ्य आहे. मग ज्याला जीथे सखी दिसेल, तिथे तो देऊळ बांधतो. आपण सीतेचं देऊळ बांधतो. राधेचं, मिरेचं, दमयंतीचं... सगळ्यांची मंदिरं उभारतो. आपल्याला तर अश्या मंदिरांच्या प्रासादिक गाभार्र्यात पहाटेचे दवबिंदूही जपून ठेवायचे असतात. पण सखी काही काळ प्रकट झाली, म्हणजे ते अस्तीत्त्व सखी होत नाही. सखी कधी राधा असते, मिरा असते, कालपुरुषाची वनवासात सोबत करणारी सीता असते. पाच पतींचा सांभाळ करणारी द्रौपदी असते, आणि तीला आपल्या पाच मुलांची अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याची आज्ञा करणारी कुंतीही असते. तरीही सखीचं अस्तीत्त्व त्यांच्याही पलीकडे असतं.

सखीला आईच्या हाताच्या दूध-भाताचा स्नेहमय गंध असतो. प्रेयसिच्या पेटत्या स्पर्षाचा मोगराही सखीच असते. आराधना जेवढी बळकट, प्रार्थनेत जेवढं बळ, आणि समर्पणात जेवढी निरागसता, तेवढी सखी जास्त समीप असते. प्रेयसी-पत्नी म्हणूनच सखीला काहीही चोरून न ठेवता व्यक्त होता येतं. म्हणून कदाचीत सखी प्रेयसी म्हणून अधीक भावते. तसं सखीचं अन आपलं शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधासाठी निर्माण झालेलं कुठलंच नातं नसतं. पण व्यक्ततेची उत्कटता जीथे साध्य होते, ते नातं, त्या त्या परिवेषात आपल्याला जवळचं वाटतं. कुठलंही नातं गरजेवर आधारीत असतं. गरज बदलली की नातंही बदलतं. बदलणार्र्या प्रत्येक गरजेला आपली ओंजळ देण्याची क्षमता आणि ईच्छा फक्त सखीतच असते. सखी मग आई होवून सावली देते, प्रेयसी होवून समर्पण देते, तीच्या समर्पणाची गोंदणं शरीरभर उमटलेली असतात. प्रेयसी झालेली सखी तूमच्यावर पूर्ण अधीकार मिळवते. पण तीच्या अधीकारात आर्जव असतं. तीच्या अधीरतेला संयमाचा लाजरा स्पर्ष असतो. पण तीचं कोसळणं मात्र अनावृत्त, अनाघात असतं. मिलनाचा एक मत्त भावगंध दरवळतो. अस्तीत्त्वाच्या चौकटीला तीथे थारा नसतो. देहभान हरवीणे आणखी कशाला म्हणायचं? देहभान हरवलं, की मग देहाचं नेमकं भान येतं. या नेमकपणाच्या अवस्थेलाच समाधी म्हणतात. सखीच्या उन्मुक्त समर्पणातूनच समाधीवस्था प्राप्त होते.

सखी साधी असते. शृंगाराचा अनैसर्गीक देखावा नसतो. सौभाग्याचा टिळाच तो काय तीच्या भाळी असतो. असा साधेपणाच तीचं सौंदर्य आणि सामर्थ्य असतो. सखी साजशृंगारानं नटली, तर कहर करेल. सखी तरल असते. सख्याच्या बाबतीत ती हळूवार असते. रात्र ओथंबून गेल्यावर आळसावून निजलेल्या सख्याच्या देहाखालून ती हळूच वस्त्र खेचते. शयनगृहाच्या खीडकीचे पडदे ओढून घेते. एखादी चूकलेली चांदणी त्याच्या शेजारी येऊन पहूडली तर? सखी अश्या अनेक रूपात दरवळत असते. रात्र मोगरामोगरा झाली, की गात्र संपन्न समाधानानं थकतात. सख्याकडे नजरेचा रेशमी कटाक्ष टाकून सखी दिवसाच्या स्वागताला लागते. संसाराचा सांभाळ तीलाच करायचा असतो. ती प्रतीपालक असते. अधरातली मस्ती डोळ्यात साठवून ती कार्यमग्न होते. अंगण झाडणारी सखी, सडा-संमार्जन करणारी सखी, तुळशीजवळ हात जोडून उभी असणारी सखी, स्वयंपाकात मग्न असलेली सखी, तुम्हाला वाढतांना तृप्त होणारी सखी...

सखी भूपाळी असते. सखी मालकंस असते. सखी पूर्वा असते, सखी भैरवीही असते. पायात पैजण, हातातल्या बांगड्या, कानातली कर्णफुलं, केसात माळलेला गजरा, सखीच्या देहभर संगीताची मैफील सजलेली असते. सखी म्हणजे मुर्तीमंत संगीत. सखीच्या वावरण्याच्या देहनक्षी देहभर पसरलेल्या असतात. ती एक दैवलीपीच असते. वाचता आली तर वाचतो आपण. सखी म्हणजे नक्षी. सखी म्हणजे रंग. सखी म्हणजे संग. सौंदर्याचा. हे सौंदर्य मग देहऊभारी देतं. वागण्यात डौल येतो. कामाला वेग येतो. आत्मसन्मान डवरतो. सखी हे सारं फुलवते. व्यक्तीमत्त्व खूलवते. सखी म्हणजे आत्म्याचा श्वास. सखी म्हणजे पूर्णत्त्वाचा ध्यास... सखीच्या देहभर खेळतांना तिच्या कुशीत आपण केव्हा वाढू लागतो, तेच कळत नाही. कूस खूशीत आली की सखीला आत्मभान येतं. देहाचं मंदिर होतं. निजलेल्या बाळाला थोपटतांना सखीचे हात अंगाई होतात. बघता बघता सखी सख्याचीही आई होते. सखीचं हे रूप देखील पुर्णत्त्वाचा भासच. सखी पुर्णत्त्वानं अवतरणं हा परत शोधाचा विषय. सखी अशीच अंशाअंशानं भेटत जाते. पैंजणांच्या रूणझुणीतून, पहाटेच्या निशःब्द आलिंगनातून, पक्ष्य़ांच्या उबदार घरट्यातून, पारीजातकाच्या फुलं सांडण्यातून, आईच्या हातातून, प्रेयसीच्या ओठातून, मंदिराच्या धूपानं दरवळणार्या गाभार्र्यातून, नंदादीपाच्या तेवण्यातून... सखीच्या अस्तीत्त्वाचा असा एक एक कण वेचीत जावा. वाटेला वाट फुटत जाते. ओंजळीतल्या क्षणांची फुलं झालेली असतात. या फुलांच्या माळा करून धावत सुटावं. मंदीराच्या असंख्य घंटा घणघणायला लागतात. दिव्यामुखी अंगार फुलतो. फुलांच्या वाती होतात. ज्योत ज्योतीमध्ये मिसळून जाते. आभाळ जमिनिला जीथं टेकतं, तीथल्या उंच कड्यावर उभं राहून जलभार झालेल्या ढगातून पाण्याचं तीर्थ घ्यावं आणि साद द्यावी - सखी.... सखी.... सखी...! सखीची भेट झाली, तरी ओंजळीतल्या फुलांसह सखी उधळून द्यावी उंच कड्यावरून आणि परत फीरावं. शोध मात्र थांबवू नये.

Friday, December 21, 2007

"ऋतूस्पर्श" कार श्याम पेठकरांना भैरोरतन दमाणि पुरस्कार प्रदान!




भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार त्यांच्यासह यशोधरा काटकर यांना "थर्ड पर्सन' या कथासंग्रहाबद्दल आणि भिन्न' कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे होते. उद्योगपती प्रेमरतन दमाणी, नवरतन दमाणी, पुरस्कार समितीचे निमंत्रक रामदास फुटाणे आणि महापौर अरुणा वाकसे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रु.२५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण गांधीजींच्या विचाराकडे पाठ फिरवली, पण आपल्याला खाते- पिते, समृध्द गाव उभे करायचे असेल तर कचकड्याच्या आयुष्यापासून दूर जाऊन निसर्गाकडे वाटचाल केली पाहिजे, असे मत लेखक श्‍याम पेठकर यांनी व्यक्त केले. झाडांचे हात, वेलींची साथ आणि फुलांची पायवाट सोडून दिल्याने निर्माण झालेली आत्महत्या करायला लावणारी स्थिती बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

विशिष्ट लेखनाचे साचे मोडून टाकणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांची निवड पुरस्कारासाठी केल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.द.हातकणंगलेकर यांनी पुरस्कार निवड समितीचे कौतूक केले. दाहक वास्तवाला भिडणाऱ्या लेखकांची नवी पिढी निर्माण होत आहे, त्याचे समाधान होत आहे, असे ते म्हणाले. मराठी साहित्यात या तीन पुस्तकांनी क्रांती घडवली आहे, असे नमूद करून केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकातील वास्तवाच्या आगीचे चटके दाहक असल्याचे सांगितले.

प्रारंभी उद्योगपती नवरतन दमाणी यांनी प्रास्तविक केले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. निवड समितीचे सदस्य कवी दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, द.ता.भोसले, शरदकुमार एकबोटे, डॉ. गीता जोशी, राजेंद्र दास यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Sunday, December 2, 2007

ऋतुस्पर्श ला प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी पुरस्कार...


श्‍याम पेठकर यांचा ‘ ऋतुस्पर्श ’ हा ललित लेखसंग्रह यांना यंदाचा मराठी साहित्यात प्रतिष्ठेचा मानला जाणारा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समिताचे अध्यक्ष, उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरात ही घोषणा केली. पंधरा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे एकोणिसावे वर्ष आहे.
१६ डिसेंबर रोजी इथल्या हुतात्मा स्मृती मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येतील.
पुरस्कार वितरण समारंभानंतर रात्री नामवंत गझलकारांच्या गझलांचा "आभाळ चांदण्यांचे' हा कार्यक्रम होणार आहे. माधव भागवत, सुचिता भागवत यांचे गायन आणि भाऊ मराठे यांचे निवेदन यात असेल.
पुरस्कार निवड समितीत दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. द. ता. भोसले, शरदकुमार एकबोटे, प्रा. राजेंद्र दास व डॉ. गीता जोशी यांचा समावेश आहे. सुमारे दिडशेहुन अधीक साहित्यकृतींतुन या पुरस्कारासाठी ऋतुस्पर्श ची निवड करण्यात आलेली आहे. हलसगिकर यांनी सांगीतले, की सामाजीकता, संवेदनशीलता, विचार आणि लालित्य यांचा विचार करून यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यकृतींची निवड करण्य़ात आलेली आहे. श्याम पेठकरांचा ऋतुस्पर्श निसर्गातील विविध पैलुंचे रमणिय दर्शन वाचकांना घडवतो, असे ते म्हणाले.
यापुर्वी हा पुरस्कार मंगेश पाडगावकर, वसंत बापट, डॉ. निर्मलकुमार फडकुले,आदी मान्यवरांना मिळालेला आहे.
नागपुरातून मात्र केवळ कविवर्य ग्रेस आणि कवी लोकनाथ यशवंत यांनाच हा पुरस्कार मिळाला होता.
श्याम पेठकर हे हा पुरस्कार 'ललितसाहित्य' या क्षेत्रात मिळवणारे विदर्भातील पहिलेच लेखक आहेत. शिवाय पत्रकारीता या क्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती आहेत.

या उपलब्धीबद्दल श्याम पेठकरांचे हार्दीक अभिनंदन!

Tuesday, September 25, 2007

ईसाप आणि बालकवींचा ऋतूस्पर्श!


प्रत्येक ऋतुत निसर्गात वेगवेगळे लक्षणिय बदल होतात आणि याचा परिणाम माणसांवर होतो. कधीतरी हे बदल माणसाला आकर्षून घेतात. त्याल ऋतुचा स्पर्श होतो, आणि....

- साप्ताहीक लोकप्रभा मध्ये नुकतेच प्रकाशीत झालेले श्री. प्रमोद चुंचूवार यांचे समिक्षण.

सध्या या समिक्षणातील काही अंश प्रकाशीत करीत आहोत. संपुर्ण समिक्षण वाचण्यासाठी टीचकी मारा


कुबेराने आपला खजीना उधळून द्यावा किंवा, आकाशात एकाच वेळी हजारो ईंद्रधनुष्ये उमलून यावित तश्या अनेक प्रतिमा, हृदयस्पर्षी कल्पना आणि रुपकांचा खजीना पुस्तकभर विखुरलेला आहे. 'चाफा आरक्त होत मुकपणे बोलू लागलेला असतो, तेव्हा चित्र प्रकटला असतो.... आंब्याचा मोहर लाज लाजून फळला असतो, तेव्हा चैत्र अवतरित झाला असतो.' सौंदर्याचं तत्वज्ञान शिकण्यासाठी चैत्राला शरण जावं, असं सांगत लेखक चैत्राचं चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभं करतो. निसर्गाचं सौंदर्ये रसिकपणे टिपता त्या सौंदर्यावरच हावरटपणे तुटून पडणार्र्या माणसाच्या वैगुण्यावर हे ललितबंध नेमके बोट ठेवतात. आणि म्हणूनच केवळ ललित साहित्य किंवा निसर्ग साहित्य या चौकटीत ऋतूस्पर्शचे विश्लेषण करता सामाजीक अंगानं या साहित्याचं विश्लेषण करावं लागतं. महात्मा गांधी म्हणतात की निसर्गे माणसाच्या गरजा भागवू शकतो, पण त्याची हाव भागवू शकत नाही. ऋतूस्पर्श या ललित बंधात हाच संदेश पटवून देण्यासाठी निसर्गाचं अद्वीतीय अंतरच लेखकानं उलगडून दाखवलं आहे. कारण माणूस सौंदर्याचा पुजक या नात्यानं आस्वाद घेऊ शकतो, आणि त्याला सौंदर्य एकदा पटलं की, तो शांततेच्या निसर्गाच्या कुशीत जगायला शिकेल. निसर्गाला ओरबाडणार नाही. ऋतूस्पर्शाच्या मागची प्रेरणा बहुधा हिच असावी. पण केवळ ऋतुंच्या अवस्थेचं निरिक्षण हे ललितबंध नोंदवत नाहीत, मोगरा, चाफा यांसारख्या यासारख्या ललितबंधातुन लेखक या फुलांकडे पहाण्याची नविच सौंदर्यदृष्टी आपल्याला प्रदान करतो. आणि मानवी समाजातही आपल्या आजूबाजूला मोगरे आणि चाफे आहेत, याची प्रचीती देतो. त्यांचा सुगंध सहवास मिळण्याची प्रेरणा देतो, स्थीतप्रज्ञ म्हटले की, श्रीक्रुष्णाचं नाव आपल्या डोळ्यांपुढे येतं. पण त्याही आधी, हजारो वर्षांपासून एक फुल स्थीतप्रज्ञाचं जीणं कसं असावं याचा प्रत्यय देत आहे, ते म्हणजे चाफा. या सर्व ललितबंधांमध्ये प्रतिकात्मकता प्रतिभा यांचा कळसच साधला आहे. मोगरा हा लेख म्हणजे तर मास्टरस्ट्रोकच. केवळ वेणीत माळलं जाणारं शृंगारीक फुल म्हणजे मोगरा, एवढीच ओळख असलेल्या या फुलाचं वेगळं रुपच लेखक दाखवून देतो. खडतर परिस्थीतीत फुलण्याचं, योग्य वेळी समर्पीत आणि सन्यस्तही होण्याचं प्रतीक म्हणजे मोगरा. मोगर्र्याच्या जन्माबाबतचं लेखकाचं निरिक्षण तर अचंबीत करणारं आहे. "ऋतू तापत जातो. भोगाचे अनुताप विद्रुप होत जातात. सारं सारं चीरडून टाकण्याच्या अवस्थेत फुलांनी कसं फुलावं? फुलांक़डे आर्त सुगंध असतो, हळवे रंग असतात, पण तापट अन्यायाला करडा विरोध करण्याचं धैर्य नसतं. पण अशा जाळून टाकणार्र्या तहानलेल्या वातावरणात मोगरा मात्र धैर्यानं फुलतो. तेजाचा ताप चळत असतांना मोगरा तेजाचं ओज ग्रहण करतो. जळणं आणि उजळणं यातील फरक मोगर्र्याच्या अगदी सहज जाणिवेच्या पातळीवर असतो.
सध्या आपण पावसाळा अनुभवतोय. पहिल्या पावसाला लेखकाने कसं शब्दात नेमकं पकडलंय ते बघा पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो.
निसर्गावर विजय मिळवून त्याला गुलाम करण्यासाठी माणसाचा सध्या सर्व पातळ्यांवर आटापिटा सुरु आहे, मात्र अशा अंदाधुंद प्रगतिची कोणती फळं आपल्याला भोगावी लागतील, याचा तत्वचींतकासारखा ईशाराच लेखक देतो.
"माणसांच्या आज्ञेत वाढणारी झाडं नेहमीच केविलवाणी असतात. झाडांच्या सावलीत वाढणारी माणसं मात्र सदाबहार असतात." निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातेसंबंधाबाबत चिरकालीन सुभाषीत ठरेल, या ताकदिचं हे वाक्य पेठकरच लिहू जाणोत. "फुलांशी मैत्री करता आली, तर मग ते तुम्हाला प्रत्येक ऋतूच्या खाणाखूणा सांगतात. प्रत्येक ऋतुची एक गोंदणलिपी असते." असं लेखक जेव्हा आपल्याला सांगतो, तेव्हा आपल्याला ऋतुस्पर्श ची ओळ ओळच एक विस्मयकारी प्रत्यय देते. तो म्हणजे, लेखकाची पाना-फुलाशी मैत्री झालीय अन त्याला केवळ ऋतूचीच नाही, तर माणसाच्या स्वभावाचीदेखील गोंदणलिपी वाचता येते.
तुमच्यातला हळवा, संवेदनशील माणूस कॉंक्रीटच्या जंगलात हरवला नसेल, आणि ही गोंदणलिपी तुम्हालाही समजून घ्यायची असेल, तर ऋतुस्पर्श वाचायलाच हवा. कारण आपल्याला केवीलवाणा निसर्ग नको, तर सदाबहार मानवी समाज हवा आहे.

Sunday, June 24, 2007

बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट

 

(ऋतुस्पर्श या पुस्तकावर सकाळ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजीत यांचे समिक्षण!)

हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरविली आहे.
वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे.

"गेल्या हजार वर्षांच्या मराठी साहित्याच्या पसाऱ्यात शब्दांच्या आणि शब्दामधून मांडण्यात येणाऱ्या भावनांच्या ज्या खेळ्या मांडल्या गेल्या त्यात श्रीमान संत ज्ञानेश्‍वरांच्या खेळ्या अप्रतिम आहेत. शब्दांची रचना, भावनांची रचना; त्यासाठी वापरायच्या चपखल आणि जिव्हारी जाऊन बसणाऱ्या प्रतिमा आणि प्रतीकं याबाबतीत ज्ञानेश्‍वर माउलीला तोड नाही....शब्दांच्या, भावनांच्या, प्रतिमांच्या, प्रतीकांच्या बाबतीत आधुनिक काळात श्‍याम पेठकर माउलीची उंची गाठू पाहतात, असं मला वाटतं.''...."ऋतुस्पर्श'च्या प्रकाशन सोहळ्यातील राजन खान यांचे हे वाक्‍य मला अजूनही विसरता येत नाही. अलीकडच्या काळात एखाद्या साहित्यकृतीची तुलना करताना एवढं दिलदार आणि दिलखुलास होणं भल्याभल्यांना जमलेलं नाही. राजन खान हे नाव अपरिचित नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकानं ही दिलेरी दाखविली तेव्हा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित होते. "मौनराग'मधून स्वतःचे आस्वादक आयुष्य ताकदीने मांडणाऱ्या एलकुंचवारांच्या साक्षीनं त्यांनी श्‍याम पेठकरांना ही पावती दिली. मुख्य म्हणजे, राजन खान यांनी हे भाषण मुद्दाम लिहून आणलं होतं. मी असं बोललोच नाही, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली होती.

"श्‍याम निसर्गावर अतिशय प्रेम करणारा लेखक आहे. इंग्रजी साहित्यात वर्डस्वर्थच्या साहित्यकृतीतून ही झलक दिसते. वर्डस्वर्थने जसं निसर्गावर भरभरून प्रेम केलं, तसंच श्‍यामनंही भरभरून लिहिलं आहे. श्‍यामनं जे लिहिलं त्यातून मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला'', या शब्दांत कौतुकाची थाप दिली आहे, महेश एलकुंचवार यांनी. प्रकाशन सोहळ्यात दोन दिग्गज "ऋतुस्पर्श" वर एवढं भरभरून बोलले. त्यामुळे त्यात नक्की काय आहे, यविषयी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.

"ऋतूवेगळ्या माणसांच्या सहवासानं ऋतूंनाही दंभ चढतो. दंभांचा पसारा वाढत गेला की ऋतू उर्मट होतात. हळव्या जीवांच्या कोवळ्या स्वप्नांची त्यांना काळजी वाटत नाही. फुलावर सावली धरत कळ्यांची चिंता करण्याचंही ते मग नाकारतात. पाऊस थोडा उर्मट झाला की, नद्या बिनदिक्कत गावात शिरतात. पिकानं डवरलेलं रान वाहून नेतात. रडणारे डोळेदेखील अशा पावसात वाहून जातात....'' हे आहे "ऋतुस्पर्श"मधून व्यक्त झालेलं लेखकाचं मन.

"ऋतुस्पर्श'मधून फक्त निसर्गच व्यक्त झालाय असं नव्हे. त्यात आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे संदर्भही जिवंत होऊन नजरेपुढे येतात. यात बावरलेली गोरेटली सासुरवाशीण आहे, कावळ्यांची कावेबाज कावकाव आहे, कुस्त्यांचा फड आहे, दुलईतला मालकंस आहे, पहाटेचा काकडा आहे, पाटलाचा वाडा आहे... आणखीही बरंच काही. तेही अत्यंत दमदार. त्यात आगळी नजाकत आहे. एकतर या ललितबंधातील शब्द न शब्द सकस आहे. भाषा विलक्षण प्रभावी आहे, कारण ती प्रवाही आहे. भाषेचं वैभव काय असतं असं कुणी विचारलं तर "ऋतुस्पर्श'चा दाखला डोळे झाकून देता येईल. "ऋतुस्पर्श'मधील लिखाण डोळे मिटून निसर्ग आठवायला भाग पाडतं. आपणही याच निसर्गाच्या सोबतीनं वाढलो. आपल्याला ही नजर का लाभली नाही, याची कुठेतरी खंत वाटून जाते. निसर्गाच्या या खाणाखुणा अजूनही सभोवताल पसरल्या आहेत याची जाणीव होते. आणि पुस्तक वाचून होते तेव्हा जगाकडे पाहण्याची सहजसोपी परंतु अचाट दृष्टी लाभलेली असते. वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, शांता शेळके, ग्रेस, एलकुंचवार यांच्यासारख्या ज्येष्ठांनी या प्रकारच्या साहित्याचे दालन समृद्ध करून टाकले आहे. अशा अनेक इतर लेखकांनाही ऋतूंनी भूल पाडली आहे. "ऋतुस्पर्श' या ललितबंधात डोकावताना दुर्गाताईंच्या "ऋतुपर्वा'ची आठवण हमखास येते. त्यांनी ज्या पद्धतीने ऋतूंचा पट उलगडला आहे, तीच किंवा त्या शैलीच्या जवळ जाणारी धाटणी "ऋतुस्पर्श'मधून गवसते. या पुस्तकाचा एकूणच बाज प्रेमात पाडणारा आहे. विवक रानडे हा अफलातून माणूस आहे. श्‍याम पेठकरांचे निसर्गावरील ललितबंध विवेक रानडे यांच्या मुखपृष्ठामुळे अधिकच उत्कट झालेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. "ऋतुस्पर्श'ची मांडणी केवळ सुबक, देखणीच नव्हे तर हृदयस्पर्शी झाली आहे.

खरेतर, आजकाल ऋतू केव्हा येतात आणि जातात हेच समजेनासे झाले आहे. आधी लालबुंद पळस बहरला की ऋतूबदलाची जाणीव व्हायची. आता शिव्यांची लाखोली ऐकू आली की शिमगा आल्याचे कळते. रखरखीत उन्हाची फिकीर न करता चालणारी पावले सावली दिसली की आपसुक थबकायची. तो गारवा अंतर्मनात झिरपायचा. आजकाल मजल्यांच्या वाढत्या उंचीने सावली खरेदी करणारे नवे दूत निर्माण करून टाकले आहेत. "जमाना बदललाय', ही हाकाटी तशी नवी नाही. गर्दीच्या आणि गदारोळांच्या कायम वास्तव्याला अनेकांची मने सरावली आहेत. अशांच्या मनात गहिवरांचा दुष्काळ वाढतो आहे. अशावेळी निसर्गातील सात्विकता शोधली पाहिजे. पहाटे उठून दवबिंदू टिपले पाहिजेत. त्यासाठी वेळ काढावा लागतो. हिशेब, आकडेमोडीच्या जंजाळात न अडकता अपूर्व आत्मानंद मिळवायचा असेल तर ऋतूंचे संदर्भ जाणले पाहिजेत. सर्वत्र गोंधळ आणि कल्लोळ दिसू लागला असल्याने निरागस स्वप्नांनीही आयुष्याकडे पाठ फिरवली आहे. वसाहती विषादाने भारल्या आहेत आणि बेगुमान माणसांचे कंपू अधिकाधिक उन्मादक होऊ लागले आहेत. हे चित्र सरावाचे झाले असतानाच छळ, राग, दुरावा आणि दुस्वासाने ग्रासलेल्या बेइमान वास्तवावर सुगंधी चिमूट उधळण्याचे काम "ऋतुस्पर्श'ने केले आहे. यातील ऋतूबदलांची ताकद माणसांना बदलवायला लावेल. सुकलेले माळरान बघून हिरमुसलेल्या जीवांनी हे पुस्तक अवश्‍य वाचावे. यातील जांभळ्या मैनांशी हितगूज करावी, दवभरला दिवस अनुभवावा. थिजत जाणारे तळे काय असते हे समजून घ्यावे. रंगधून पारखावी, पाखरांची पावले शोधावी. निसर्गाशी एकजीवत्व साधणारी लेखकाची हातोटी तृप्त करून टाकणारी आहे.

अनेक मोठ्या लेखकांना बेदखल करून टाकण्याची परंपरा अलीकडे उदयास आली असे नाही. ती जुनीच आहे. नको तो ताळेबंद जपणाऱ्यांचा गोतावळा अनेक ठिकाणी आढळतो. अशांनी आधी "ऋतुस्पर्श' वाचावे. "मौसम केसाथ साथ बदल जाना चाहिये...' असे अब्बास दाना बडौदी म्हणतात. ते अनेकांना कळविण्याची गरज आहे. स्वतःचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊन आयुष्यभर तंडत राहणाऱ्यांनी तर "ऋतुस्पर्श' वाचलेच पाहिजे. अस्तित्व विसरून ओथंबून येण्यातही वेगळा आनंद असतो की नाही?

-श्रीपाद अपराजित
Posted by Picasa

Wednesday, June 20, 2007

पहिला पाऊस

वार्र्याचे श्वास ओलसर झाले की, मग पाऊस येतो. शिशिरात झाडं बोडकी होतात. वसंतात झाडं पानंपानं होतात. झाडांच्या काळसर निब्बर खोडांवर फुटलेली ही कोवळी हिरवी लव सावली धरायला लागली की, मग पावसाचे थेंब तोलून धरण्याची ताकद पानांमध्ये येते. पाऊस असा नेमक्या वेळी येतो. अवघ्या सजीवांची पाळंमुळं तहानली की, पाऊस येतो अन पाणी धरून ठेवायला जीथं मुळं असतील तिथेच टिकून राहतो. पावसाची हळवी, ओली, रौद्र, भिषण रुपं असू शकतात. पण पहिल्या पावसाचं मात्र तसं नसतं. जन्मदात्याबद्दल कृतज्ञतेचीही ओळख नसलेल्या अर्भकासारखा तो निरभ्र, निरागस असतो. हा पाऊस मनी ध्यानी नसतांना येतो. येईल, येईल अशी आशा विझत गेल्यावर, चिडचिड्या उन्हाशी परत जमवून घेण्याचा प्रयत्न करतांना मग पाऊस येतो.विरहाचे तडे गेलेल्या जमिनिचे उसासलेपण हुंगून पाऊस निघून जातो; पण येण्याचं वचन देऊन. रोडावलेल्या नदीच्या फाटक्या उराला थेंब थेंब टाके देतांना, पाऊस नदिच्या ओटीत पाण्याच्या दोन ओंजळी ओतून रेतीत पाय गाडून बसतो. अश्यावेळी नदिकाठची समाधिस्थ शिळा देखील हलकी होते. पावसाने नदीच्या वाळूत घर केलं की, नदीचा बांधा सुडौल होतो. पण एक होते- पहिल्याच पावसात नदिची वाट निसरडी होते. पावसाची नजर चुकवून आलेल्या एखाद्या चावट संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा बहाणा कुणी करू नये.
पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. नवनिर्मितीचं हे बीज कुठेही असू शकतं. कसंही ते येऊ शकतं. डोळ्यांतल्या स्वप्नांची लिपी वाचण्याची कला जन्मजात अवगत असणार्र्या पाखरांच्या अस्तीत्त्वाशीच हे बीज सलगी करून असतं. पहिला पाऊस नेमकं ते हुडकून काढतो. परागंदा झालेल्या वासरांनी वाळीत टाकलेल्या गावातल्या वाड्याच्या कौलारू छतावरही मग पिंपळ साकारतो. कौलारू घरांच्या छतावर हिरवळ दाटून येते. हे निर्मितीचं बिज कुठेही असू शकतं. तुमच्या-आमच्या हृदयातही. म्हणूनच सहनशक्तीची परिक्षा घेऊन आलेला पहिला पाऊस पाऊसबावर्र्या मनात कविता जागवितो. नांगरलेल्या शेतातील तासांमधून हा पाऊस पळत सुटतो.
जीवनात अनेक पावसाळे पाहणार्र्या जख्ख जीवांना देखील पहिला पाऊस भेटतोच असे नाही. अवघा पावसाळा डोक्यावर घेत मोकळ्या आकाशाखाली फीरत राहिलं, तरी पहिला पाऊस भेटत नाही. हा पाऊस हटखोर असतो. पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्याचे मोती करता आले, तरच हा भेटतो. डोळ्यांत ढग साठवण्याचे कसब ज्याला साधले त्यालाच हा पाऊस भेटतो. मग तो कधीकधी पावसाळा सरतांनाही भेटतो. चिंबचिंब भिजून रिमझिमत राहण्याची शपथ तो देऊन जातो. एखाद्या गंगापूत्रालाही तो समरांगणी शरपंजरी पडला असतांना भेटतो. कुणाला भेटायचंच असेल तर तो ग्रीष्माच्या परसात घुसखोरी करूनही भेटतो. ज्याची नाळ मातीतच गाडली आहे, असे जीव अस्तीत्त्व नांगरून बसतात. ओसाड आभाळाकडे बघत त्यांच्या डोळ्यांमध्ये ग्रीष्म दाटून येतो. डोळे मीटताच मग पावसाच्या आठवणींचे तप्त कढ पापण्यांच्या कनातीतून बाहेर पडतात. अश्या हळव्या वेळी हा पाऊस अनवाणी पायांनी शेत तूडवीत ते कढ झेलून घेतो. असा पाऊस मग आभाळभर होतो. बांधावरच्या बूंध्याला टेकून पावसाची वाट पाहणार्र्याच्या आसूसल्या चेहर्र्याला पावसाचे थेंब कुरवाळतात. शेतामध्ये मग गोरा कुंभार नाचू लागतो. जमीन दाणे मागू लागते. अर्थात हे मागणं भरभरून देण्यासाठी असतं. घरट्यांवर पंख अंथरून पाखरं अंगाई गातात. मातीशी नातं असणार्र्यांची मग धावपळ सुरू होते. बैलांच्या पावलांनी जमीन लेकूरवाळी होते. चंद्रमौळी झोपडीचं छतही मग गोवर्धन होतं. पावसाच्या सार्र्या व्यथा छत झेलून घेतं. अशा पावसाला नाविन्याचा ध्यास असतो. पाऊस मग झोपडीच्या छतातून आत शिरतो. दुधपितं लेकरू आईजवळ सरकतं आणि गोठ्यातल्या गाईच्या निळ्या डोळ्यांत हिरवं रान उगवतं.
हा पहिला पाऊस ओसरला की, कुपावर कारल्याचा वेल काट्यांशी बोलू लागतो. रान गारगार होतं. वारा चिंबचिंब होतो. अंगावरची धूळ झटकून झाडं, पहिल्या रात्रीनंतर नुकत्याच न्हालेल्या नवपरिणीत वधूसारखी संपृक्त टवटवीत दिसतात. कौलारू छतंही आरशासारखी चकचकीत होतात. पहिला पाऊस असा धूळ झटक़णारा असतो. शरीरावरची आणि मनावरची देखील.

पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन पाण्याची भिती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पहिला पाऊस गावात येण्याआधी गावाने सुकी लाकडे जमवून ठेवावी. ऐन पावसाळ्यात गावात कुणी मेलेच, तर अडचण नको. मरणाचे स्मरण असे नेणिवेच्या पातळीवर असतेच. वाढत्या वयाबरोबर हे धूके अधीक गडद होऊ लागते. मरणाशी नजरभेट झाली, की डोळ्यांना कोवळे अंकूर फूटत नाहीत. पाऊस नेहमीचाच अनुभवायचा असेल, तर जिवंत माणसांनी जातिवंत डोळे हिरव्या पानांआड दडवून ठेवावे. नाहितर मग पाऊस जाणिवेच्या पातळीवर येतच नाही. पेशींनी अंकूरण्याचे नाकारले की, जीवांना पावसाची धुंदी चढत नाही. अश्यंना पहिला पाऊस भेटूच शकत नाही. जाणिवा जीवंत ठेवल्या की, पाऊस पहिला होवून भेटतो. हा पाऊस असा कधीच भेटला नव्हता. ऐन पावसात इमारतीच्या गच्चीवर ऊभे राहून तीच्या केसात फुलं माळतांना सुद्धा पहिला पाऊस भेटला नव्हता. पाऊस कळायला लागण्यासाठी त्याची ओळख असावी लागते. ती करून घ्यावी लागते. पावसाचेही संस्कार करावे लागतात.
साडेतीन वर्षाची चीमुरडी. यंदा पाऊस कधी येणार?, हा प्रश्न घेऊन भिरभिरत होती. वार्र्याला सदाफूलीची ओंजळभर फुलं देऊन तीने त्यालाही प्रश्न विचारला होता. कोरडा वारा मुकपणे तीच्या बटांमध्ये बोटं फिरवून निघून गेला. प्रश्न कायम होता आणि ढगांकडेही उत्तर नव्हते. शापित गंधर्वाने आपल्या सखीसाठी मेघाला दिलेला निरोपही ईतका आर्त नसावा. पाऊस न अनुभवलेली चिमुरडी पावसाची वार्ता विचारत होती. तिला ईवल्याश्या मुठीत पाऊस साठवून ठेवायचा होता. अखेर तीच्या डोळ्यांच्या कडांवर हा प्रश्न सुकून गेला. गोबर्र्या गालांवर सुकलेल्या पाण्याची नक्षी तरारली, पण पाऊस आलाच नाही. घराच्या परसदारी, तूळशीपाशी, हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून ती बसून राहिली आणि वार्र्यालाही कळू न देता तो आला. एका टपोर्या थेंबाने कळूच तीच्या डोक्यावर टपली मारली. काय आहे? मग पाण्याच्या थेंबांची गर्दीच झाली. अंगणात एकेक थेंब जमिनित रूतून बसला. अगदी इतर वेळी तिने ते थेंब रांगोळी काढण्यासाठीच वापरले असते. थेंबांनी तीला गोंजारायला सुरूवात केली अन ती आनंदाने चित्कारली - "पाऊस आला!" तान्ह्या पावसात चिमुकलीसोबत भिजतांना अचानक जाणवलं, हा पहिला पाऊस आहे. पाऊसधारांनी बावरलेली ती, तिने इवल्याश्या हातांनी गळ्याभोवती गच्च मिठी मारली. कमरेभोवती पायांचा वेढा घातला अन पाऊसच कडेवर आल्यागत वाटले.
पहिला पाऊस असा अचानक भेटतो. साधना असावी लागते. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे अर्धे भिजत जाणार्र्या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो. कधी तीला पाऊस भेटतो, तर कधी त्याला. दोघांनाही एकाच वेळी पाऊस भेटणं हा दैवदुर्लभ योग आहे. तिच्या मोकळ्या केसांमधून ओघळणारे पावसाचे मोती तो ओंजळीत वेचतो, तेव्हा पाऊस पहिटकर असतो. तिच्या केसांच्या सरी मग जीवन क्यापून टाकतात. पाऊस मग सरी विंचरून वेणी घालतो. हवंहवंसं बंधन घालणार्र्या शृंखलाच होतात तीच्या बटा. ते बंधन असलं तरी रेशमी असतं. आकाशी असतं. पाऊस असा भेटण्याचा तो एकच क्षण असतो. त्यानंतर त्याने तिचे केस पिळून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस येइल, पण तो पहिला नसेल.
पहिला पाऊस भेटतो रानात. मनात. आईच्या स्तनात. पहिला पाऊस मनाच्या चोरकप्प्यात दबा धरून बसलेला असतो. तो भेटण्यासाठी पावसाळाच असावा लागतो, असे नाही. रणरणत्या दुपारी दुसर्र्याचं उजागर सौभाग्य झालेली त्याची 'ती' त्याला भेटते, तेव्हा मनात दबा धरून बसलेला पहिला पाऊस अचानक कोसळू लागतो. अशा वेळी सावरणं कठीण असतं. पाऊस धरवत नाही आणि चिंब होता येत नाही, अशी केविलवाणी अवस्था असते. घरासमोरील अंगणात शेवंतीचं रोपटं लावतांना पाऊस हातातून वाट काढतो. ओणवं होऊन शेतात कापूस वेचतांना हाच पाऊस पाठीवर स्वार होतो. एखाद्या अंधार्र्या रात्री वारा खिडकीच्या तावदानांना धडका देत असतो आणि घरात आईचा निष्प्राण देह पडला असतो. त्या काजळ्या रात्रीही पहिला पाऊस कुंपणापाशी खिन्न बसला असतो. या पहिल्या पावसाची फुलं होतात. ती माळून ठेवता यायला हवीत.
Posted by Picasa