Sunday, May 6, 2007

ऋतूवेगळे शहर

ज्या शहरांना ऋतू नसतात, त्या शहरांना आभाळाकडे मोकळेपणाने बघता येत नाही. गर्दितल्या कोपर्र्याकोपर्र्यात आभाळाचे तुकडे अस्तीत्त्वाचा शोध घेति विसावलेले असतात. वेल फर्निश्ड फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा, गावातून शहरात आलेल्या एखाद्या हळव्या जीवाला गावातल्या स्वच्छंद ऋतुंची आठवण करून देतो. उत्तुंग इमारतींच्या टेरेसवरून दिलेले निरोप गावाकडे पोचवणे आतशा ढगांनी बंद केले आहे. शहरांवरून फरफटत वाहतांना ढगांमध्येही शहरी मोजकेपणा आलेला आहे. त्यामुळे ऋतुही शहरांना टाळून निघून जाणेच पसंत करतात. बरं, आभाळाकडे बघण्यासाठी हिरव्या झाडांच्या पानांचे डोळे लागतात. फुलांच्या पापण्यआड हे डोळे द्डलेले असतात. मुख्य म्हणजे जमिनीचा जामिन नाकारून आभाळाकडे बघता येत नाही. शहराचे तसे जमिनिशीही नाते तूटलेले असते. शहर सतत भूक शांत करण्यासाठी धड्पडत असते आणि अश्या अवस्थेत कुणाशी नाते जोडता येत नाही. नाते जोडण्यासाठी गरज संपवावी लागते आणि भूक तर सतत स्वतःशी बांधून ठेवते. म्हणून आजकाल 'भूक भागवण्याचा कलेशी संबंध जोडणारे' बंजार्र्याँचे काफीले शहर सोडून गावाकडे वळतात. कलावंतीणीच्या पायातील चाळांच्या नादी लागून ऋतुही शहरांशी उभा दावा मांडतात.

खरे तर जमिन आणि आकाश जिथे एकत्र येतात त्या क्षीतीज्याच्या कनातीखालून ऋतु गावात येतात. ऋतंच्या स्वागतासाठी गाव सज्ज असते. कधी गावच्या वाटेवर गुलमोहर आपली फूले पसरवून ठेवतो, तर अमलताशचे सोनेरी झुपके ऋतंची वाट बघतात. ऋतु यायचेत म्हटले, की गावच्या आभाळाला डोळे फुटतात. आभाळाला अशी ऋतुदेखणी नजर येण्यासाठी गावाची जमीन जेवढी असते, तितकेच गावाचे आभाळ असावे.

पाउस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो. असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जीवंत असावे लागते. गावाच्या जमीनीप्रमाणेच गावाचे आभाळ केवळ जीवंतच असते असे नाही, तर ते जातीवंतही असते. म्हणूनच ऋतंची वस्ती गावात होण्याआधी आभाळ गाईंच्या डोळ्यात उतरून जाते. पाखरे मग चोचीवर डग तोलण्याचा सराव करतात. क्षितिजाच्या कनातीतून ऋतु येण्याआधी गाव स्वतःत ऋतुंन हवे तसे बदल करून घेते. पावसाळा येण्याआधी नाही का, गाईंचे हंबरणेही ओलसर होते! झाडेही बेटी वार्र्याला कवटाळण्याचा प्रयत्न करतात. असे करतांना झाडे मात्र एक काळजी घेतात. पक्ष्यांच्या घरट्यामधील अंडी पडून फूटणार नाहीत याकडे झाडांचा कटाक्ष असतो. अश्या झाडांच्या सावलीत वाढणारी माणसंही मग तीतकीच हळवी होतात. पक्ष्यांची घरटी असलेले झाड ते सहसा तोडत नाहीत. म्हणूनच ऋतू कुठलाही असो, गावाचा झरा मात्र आटत नाही.

शहरांचे मात्र वेगळे असते. शहरात जेवढी जमीन असेल तेवढे आभाळ नसते. सिमेंटच्या जंगलाने आभाळ गीळून टाकले असते. खरे तर ऋतुंचे येणे हे माणसाच्या जगण्याच्या शैलीवर अवलंबून असते. शहरांतील माणसांची जगण्याची शैली साहसी असू शकते; पण संयमी आणि शालीन असणे शक्य नसते. शहरात येतांना गावाच्या शिवेवर घोड्याची नाल उलटी ठोकून येतात. तशी पद्धत आहे. पूर्वीचे योद्धे युद्धावर जाताना तसे करायचे. कारण युद्धावरून परत येणे शक्य होईलच, हे त्यांना माहिती नसायचे.

ऋतु माणसांना हळवे करतात. एकदा ऋतू गावात आल की, उंबरा ओलांडून जाणे तसे कठीण होते. म्हणून भुकेचे संदर्भ डोक्यात घेउन गाव सोडायचेच असेल, तर ते ऋतूंच्या संधीकालात सोडावे. कारण शहरात येतांना गावातील आपले अन्नपाणी तुटलेले असते. पण ज्यांनी जन्माच्या वेळी आपली नाळ माजघरातील न्हाणीत गाडलेली असते, त्यांनीच आपली रसद तोडलेली असते. अशी रसद तूटली, की पोटाच्या कातडी तंबूची शीवण शाबूत ठेवण्यासाठी शहरात यायचे असते. आपापल्या अस्तीत्त्वाचे अस्वल घेउन प्रत्येक माणूस शहरांत येतो. दरवेश्यासारखे आपल्या अस्तीत्त्वाचे अस्वल नाचवत शहरात पोटाच्या देव्ह्यार्र्यातील भूकदेवाची पूजा करतो.

एकदा असे झाले की, थकून कूठेतरी विसाव्यासाठी जायचे असते. शहरात भूक भागतेच असे नाही. पण प्रत्येक शहर कुठल्याही भूकेच्या आत्मारामाला आश्वासनाच्या आश्वासनाच्य आरशात भाकरीचा चंद्र दाखवण्यात वाकबगार असते. विषेश म्हणजे मानवी पाखरांसाठी शहरात सिमेंटची उंचच उंच खुराडे बांधलेली असतात. गावाच्या वेशीवर घोड्याची नाल उलटी टांगून आलेले हे पाखरांचे थवे डोळ्यांवर थकव्याची निज आणून रात्रभर खूराड्यात मरून जातात. पहाटे जीवंत होतात.

पहाट म्हणजे यांत्रीक घड्याळाचा गजर. जागही त्याच आवाजाचीच. इथे अस्ताअस्तावर सुर्य उगवत नाही. कारण या शहरांत ऋतू नसतात. ऋतू नसतात; कारण पहाट नसते, आकाश नसते. पानांचे डोळे आणि फूलांच्या पापण्या नसतात. आणि क्षीतीजही नसते. शहरी खूराड्यांच्या खीडकीतून जेवढे आकाश दिसते त्याला आभाळाचे कुठलेच संदर्भ नसतात. बुढीचे खाटले, शुक्राची चांदणी, पावसापूर्वी गारवा आलेला ढग़, अस्ताच्या सूर्याच्या डोळ्यांमधील मस्तीची नशा, संध्याकाळच्या सावल्या, अंगावरील शेवंतीचा सुगंध असे काहिच नसते. खुराड्यातल्या या आभाळाला उगवती आणि मावळतीचे रंगही नसतात. असे रंग असायला आभाळाची पाटी कोरी असावी लागते. शहराच्या या आभाळात मानवी पाखरांच्या भूकेचे ढग दाटलेले असतात. शहरात आलेली ही पाखरे, मग काही दिवसांनी आभाळाकडे बघू शकणारे ऋतूपर्ण डोळेही गमावून बसतात. डोळ्यांत आभाळ साठवणारे डोळे आणि लचकदार जास्वंदी फांदीवर स्नेहाचे नक्षी कोरणार्र्या चोची गमावलेल्या या शहरी पाखरांची दखल ऋतू घेत नाहीत. या पाखरांना ऋतूवेगेळे शहर जे दाखवील तेच दिसते. खुराड्यातून दिसणार्र्या आभाळात एखादेवेळी दूरून जाणारे विमान, एखाद्या ईंडस्ट्रीचा शेवाळलेला धूर आणि आपल्या डोळ्यांतून बाहेर पडलेल्या स्वप्नांचा पूर याशिवाय काहीच दिसत नाही.

या शहराला त्याचे पाळण्यातले नाव नसते आणि ज्या शहराला पाळण्यातले नाव नसते तिथे ऋतू येत नाहीत. ऋतूंना तिथे जाताच येत नाही. मग हे विनाऋतूंचे शहर ऋतूवेगळे होते. या ऋतूवेगळ्या शहरात उन्हाळा येत नाही, ऊन येते. हिवाळा येत नाही, थंडी येते. पावसाळा येत नाही, पाऊस मात्र येतो. पा पाऊस आभाळातून आला की, कूणाच्या डोळ्यांतून कोसळला हे कळत नाही. ते माहित करून घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. कुणाकडे तेवढा वेळही नसतो. या ऋतूवेगळ्या घडामोडींना ऋतूचे संदर्भ नसतातच. ऋतूवेगळ्या पावसाला बेडकांच्या बडबडीची माहिती नसते. जमिनीत राबतांना तुडविणार्र्या पायांचे श्रमही ठाउक नसतात. आषाढाने मोडलेल्या मौनाचीही त्याला जाणीव नसते आणि सगळ्यात भिषण म्हणजे या पावसाला हिरवेपणाची ओढ नसते. उन्हाला कोकीळेचा कंठ नसतो आणि मोहोराचा गंधही नसतो. थंडी गुलाबी मस्तीची साय पांघरून येत नाही. असे विनाजाणिवांचे मोसम शहरात येउन जातात्. ऋतू येत नाहीत; तरीही गावातून परागंदा झालेली पाखरे मात्र शहरातल्या या बेभरवश्याच्या निस्तेज मोसमांनाच ऋतू समजतात. गावाने रसद तोडली असल्याने शहरातल्या फसव्या मोसमांना आपलेसे करणे, असे अनिवार्य होऊन जाते. ऋतूवेगळे शहर मग पाखरांचे प्राक्तन होते.

No comments: