Monday, May 28, 2007

रंगधून


आयुष्यात काही क्षण सावळ्याच्या बासरीतून यमुना पाझरावी तसे तराळत येतात. मनाचा रीता डोह मग भरभरून ओसंडतो. आयुष्याचं गोकुळ होतं. स्वप्नांच्या किनार्र्यावर राधा नाचू लागते आणि रंगाचं कारंजं होतं. वसंत आला की, अशी रंगधून निनादू लागते. या रंगाला स्वरगंधाची गोड खळी पडलेली असते. या अश्या वातावरणात कायम शहाणे असणार्र्यांनाही वेड लागावं. जीवनाला जगण्याचं खूळ लावणारे हे दिवस असतात. दिवसाच्या धगीनं रात्रही पेटत राहते, मग गात्रांची काय कथा? रात्र फुलत जाते अन रात्रीची फुलं होतात. फुलं म्हणजे रंग आणि गंधांचे कोवळे दूतच. या दिवसांत मग फुलांच्याच चर्चा असतात. फुलांच्याच भेटी होतात, भेटीचीही फुलं होतात. भेटींची झालेली ही फूलं मग अनंतापर्यंत सोबत करतात. फुलांच एक बरं असतं. फुलं कोमेजली तरी त्यांच्या सुगंधांचा अर्क करून ठेवता येतो. अत्तरानं माणूस धूंद होतो, पण बेधूंद होत नाही. अत्तरानं अस्तीत्त्व मोहित होईल, पण अत्तराची नशा नाही चढत . अत्तर हृदयाचा ताबा घेतं, मेंदुला गुलाम नाही बनवीत. निर्व्याज, निष्पाप फुलांची दारू कशी होणार? सुगंध देऊन विलीन होणारं अत्तर होणं, हे फुलांचं प्राक्तन असतं. म्हणून फुलं कोमेजली की, त्यांच निर्माल्य होतं, कचरा नाही.

फुलांचा गंध श्वासात गोठवून घेतला अन डोळे मिटले की, मनात रंगवेलींची नक्षी उभी राहते. पण, गंधवेडानं श्वासांची कोरीव शिल्प होण्यासाठी सजीवांनी रंगांशी प्रामाणीक असण्याची गरज असते. समर्थपणाचा ॐकार जागविल्याशिवाय रंगांशी जवळीक साधता येत नाही. मुळात रंगून जायचे असेल, तर मनाची पाटी कोरी हवी. रंगता कशातही येतं; पण त्याआधी अस्तीत्त्व फुलांवर पडलेल्या दवबिंदूंसारखं निर्मळ असायला हवं. त्यासाठी सामान्यांनी पूजा करावी. पूजेनं मन निरभ्र होतं. निरभ्रता नेहमीच विशाल असते. अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेली असते. सकल जिवांचा दरवळ असा अनंतापर्यंत पोचण्यासाठी पूजा करायला हवी. पूजेतही रंगून जाता येतं आणि पूजा कशाचीही करता येते. प्रतीकांचीही आणि परमेश्वराचीही! ज्याला फुलं, त्यांच्या रंग गंधासहित कळली, त्याला पूजा कळते.पूजा फुलांचीही करता येते. फुलांच्या पूजेची मग कवीता होते. कविता मग तिच्या असंख्य रंगांसह अस्तीत्त्वाचा तळ गाठते. आपल्या अस्तीत्त्वाचीही पूजा करता येते. अस्तीत्त्वाची पूजा हा प्रतीकातून परमेश्वराकदे जाण्याचा मधला टप्पा आहे. या प्रवासात अस्तित्त्वाच्या तळाशी अधिष्ठीत झालेल्या कवितेची भेट होते. 'मी कोण ?' या प्रश्नाचे उत्तर केवळ कविताच देउ शकते. पूजा कवितेचेही करता येते. मग शब्दांची फुले होतात. कवितेलाही रंग चढतो. रंग मग शब्दांनाही सोडत नाही. अस्तीत्त्व कातर झालेल्या जीवांना हे रंगच शांत करतात. पूजा रंगांचीही करता येते. ही पूजा साधली की पानांचीही फूले होतात. वसंताला ही पूजा साधलेली आहे. म्हणूनच मग वसंतात पानेही विविध रंगात रंगून जातात. वसंतपूजाही होते. झंकारलेल्या हृदयाची माणसं वसंताची पूजा करू शकतात. मनात एकदा प्रेमाचा मोगरा फूलला, की वसंतपूजा नकळत सूरु होते. माणूस हळवा झाला की, उंबरे अडवितात त्याला; पण उंबरठा ओलांडल्याशिवाय माणूसपणही गवसत नाही. झंकारलेल्या आयुष्याचे अर्थही गहाण असतात, हे खरे असले तरीही वसंताची मनोभावे पूजा केली, तर जिथे वाट निसरडी होते, तेथून मागे फिरण्याचं कौशल्य आपोआपच अंगी येतं. पण त्यासाठी माणूसपण जागवावं लागतं. फुलांचं हळवेपण कळावं लागतं. रंगांधळ्यांना माणूस होता येत नाही. असे रंगांधळे मग रंग वाटून घेतात. रंगांवर अधीकार सांगतात.


रंग कधीच कुणाचे गुलाम नसतात. स्वतःचेही! समर्पणाचे दूसरे नाव म्हणजे रंग. एकमेकांत मिसळतांना स्वतःचे संपूर्ण अस्तीत्त्वच विरवून टाकण्याचं कसब रंगातच असतं. नव्हे, तो त्यांचा निसर्गस्वभाव असतो. तरीही रंग एकमेकांचे स्वतंत्र अस्तीत्त्व नाकारत नाहीत. सहजीवनाची दिक्षा रंगांकडूनच घ्यावी. आपल्या अस्तीत्त्वाच्या सार्र्याच कक्षा रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. शब्दरंग, काव्यरंग, भक्तीरंग, मनोरंग, प्रेमरंग... रंगांच्या या प्रवासात श्रीरंगाची भेट कधीही होवू शकते, पण त्यासाठी रंगांशी रंगांइतकंच समर्पित असावं लागतं. प्रेमाच्या सप्तरंगात विलीन व्हावं लागतं. आपण द्वेषासाठी पायघड्या अंथरतांना प्रेमाला मात्र नकार देतो. जीवनाचे जड ओझे निमूटपणे वाहतांना बकुळफुलांच्या भारालाच भितो.

एकदा तरी प्रेम करावं. लैलाच्या मजनूला स्मरावं. शिरीनच्या फरहादला स्मरावं. कृष्णवेड्या राधेला स्मरावं... मग जीवनाला 'गिरिधर गोपाल' म्हणत विषही प्राशन करता येतं. पचविता येतं. प्रेम अंकुरलं हृदयात की, हे फार सोपं होतं. रात्रीला चांदण्याची फुलं होतात. स्निग्ध रंगात वेल्हाळ झालेल्या रात्री तिच्या गात्रांची फुलं होतात. फुलांकडे वेळ थोडा असतो. मग ते खळखळून हसून घेतात, प्रत्येक क्षण जगून घेतात. अनासक्त अनावर झालेली ती मग हळूच त्याचा हात ओढून घेते आणि डोळ्यातील काजळाने त्याच्या हातावर लिहीते - 'प्रेम!' प्रवास असाच सुरु होतो. असे झंकारलेले जीव काहीही करायला तयार असतात. अशी प्रत्येक रात्र उजळलेल्या सकाळीकडे जात असते. पहाटेच्या भूलभुलैय्यात सुर्यही हरवतो. जर्द, गुलाबी रात्रीच्या आठवणीने मत्त केशरी होतो. क्षितिजाच्या पलीकडे रात्रीची काजळकडा तशीच असते. ती दोघं त्या काजळकळेवर विसावलेली असतात. त्यांच्या दिवसाचीही रात्र झालेली अन या दिवसाला स्वप्नांच्या लाघवी वेलींनी वेढा घातलेला. मग उज़ेडाच्या गालावर अंधाराचा तीट लावत रात्र येते. कुणाची तरी हळदभरली हळवी पावलं हळूच घरात येतात. हळदगोर्र्या हातांनी गात्रागात्रावर समर्पणाची मेंदी लावून निघून जातात. मेंदी रंगत राहते. मेंदी अशी रंगली की, हात लाजून आरक्त होतात. असे बावरे हात देहभर फिरले की, कळ्यांची फुलं होतात. ही फुलं जपून ठेवावी. कारण जातांना ते हात नेमकी कळ्यांची झालेली फुलं मागतात. फुलांची एक जमात उभी राहते. येणार्र्या रात्रीला तो त्याच फुलांचे गजरे आणतो... पण गजर्र्यांची अशी लाजरी भेट प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असे नाही. नव्हे, येतच नाही, हेच खरे. कारण प्रेमाला आपला कडवा विरोध असतो. प्रेमाच्या नकाराने विदग्ध झालेले जीव मग करपून जातात. फुलं त्यांना नकोशी वाटू लागतात. रंगांचा ते छळ करतात. स्वप्नांसह पापण्याही खुडून नेतात. पाकळ्या नखांनी कुरतडून टाकतात. अशांना मग फुलं घाबरतात आणि रंग टाळायला लागतात. असे झाले की, मग जग समजतं 'आपल्यात आला.' पण एक नक्की. रंगधून जाणली की, प्रेमाच्या कबरीचाही ताजमहाल होतो. वसंताची जादू ओसरून वेड्या रंगांनी पळ काढण्याआधीच रंगवेड्यांनी त्यात चिंब झाले पाहिजे

No comments: